आदिनाथ वर टोळधाड येण्यापूर्वी सभासदांनी गोफण तयार ठेवावी, पाटील गटाचे आव्हान.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
आदिनाथ वर टोळधाड येण्यापूर्वी सभासदांनी गोफण तयार ठेवावी, असे आव्हान पाटील गटाने सभासदांना केले.
करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल केंव्हा फुंकला जाईल हे सांगता येत नसुन लवकरच निवडणुक लागेल याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.माढ्याचे आमदार शिंदे बंधू यांनी आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर म्हणाले की शिंदे बंधू हे खाजगी कारखानदार असून आदिनाथ हा सहकारी तत्त्वावर चालणारा कारखाना आहे.
यामुळे आ. शिंदे बंधूंच्या ताब्यात आदिनाथ देणे आणि भाडेपट्टी करारावर चालवण्यास देणे या एकसमान अशाच बाबी असतील. सभासद हा धोका स्विकारणार नाहीत. सहकार हा आदिनाथ कारखान्याचा आत्मा आहे.कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या अथक प्रयत्नाने व निस्सीम त्यागातुन आदिनाथ कारखान्याची निर्मिती झाली आहे. पाटील कुटुंबाचे आदिनाथ बरोबर एक कौटुंबिक असे नाते आहे.यामुळेच माजी आमदार नारायण पाटील यांनी सर्वस्व पणाला लावून आदिनाथ कारखान्याचा यंदाचा गाळप हंगाम सुरु करण्यासाठी भक्कम अशी भूमिका बजावली.
सभासदांचा कारखान्यावरील मालकी हक्क अबाधित राहीला.परंतू आता निवडणूक लागणार याची चाहूल लागताच अनेक नेते व गट तसेच संघटना निवडणुकीत उतरण्याची भाषा करु लागले आहेत.आदिनाथ वर येणारी ही टोळधाड परतून लावण्यासाठी मताधिकाराच्या गोफणीत मतरुपी गुंडा ठेऊन सभासद सज्ज आहे. माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालीच येणारे सर्व गाळप हंगाम पार पडले जावेत व आदिनाथ सुरळीत चालू रहावा अशी अपेक्षा सभासद ठेऊन आहेत.
आदिनाथला गतवैभव प्राप्त करुन देण्याची धमक फक्त माजी आमदार नारायण पाटील यांच्यात असून सभासदांचाही त्यांना भक्कम पाठींबा आहे. इतर मंडळींना वैयक्तिक स्वार्थ पुर्ण करण्यासाठी या निवडणुकीत उतरावयाचे आहे. कोणाला आपल्या भावाच्या आमदाकीचा मार्ग अधिक सुकर व्हावा म्हणून आदिनाथच्या निवडणुकीत रस आहे तर कोणाला कार्यकर्त्यांनी आपल्याजवळ टिकून रहावे म्हणून या निवडणुकीत सहभागी व्हायचे आहे.
परंतू माजी आमदार नारायण पाटील यांना मात्र आदिनाथला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी व ऊस उत्पादक तसेच कामगारांना न्याय देण्यासाठी आगामी निवडणुक लढावयाची आहे. आगामी काळात जर सर्वानुमते निवडणुक बिनविरोध होणार असेल तर पाटील गट सुद्धा यासाठी सकारात्मक असेल. परंतू खाजगी कारखाने चालवणारी मंडळी निवडणुकीच्या माध्यमातून जर आदिनाथचे सहकाराचे हे मंदीर उध्वस्त करून स्वतःच्या राजकारणासाठी या कारखान्याचा उपयोग करु पाहणार असतील तर मात्र सभासदच अशी टोळधाड वेळीच परतवून या राजकीय टोळांचे व टोळींचे मनसुबे उधळून लावतील असा विश्वास प्रवक्ते सुनील सदाशिव तळेकर यांनी व्यक्त केला.



