मतदारांनो लक्ष द्या! उद्यापासून ‘बीएलओ’ येणार तुमच्या दारी; मतदार पडताळणीची विशेष मोहिम सुरू

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
अकलूज: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५४-माळशिरस (अ.जा.) मतदारसंघात उद्या दिनांक ३० जून २०२६ पासून विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) अंतर्गत मतदार पडताळणीच्या धडक मोहिमेला सुरुवात होत आहे. ही मोहिम २९ जुलै २०२६ पर्यंत अविरत सुरू राहणार असून, यामध्ये मतदारांची घरपोच पडताळणी केली जाणार आहे.
BLO देणार घरोघरी भेटी, ३ वेळा येणार संधी!
या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करणार आहेत. जर पहिल्या भेटीत मतदार घरी भेटला नाही, तर बी.एल.ओ. एकूण ३ वेळा घरी येऊन संपर्क साधतील.
‘गणना फॉर्म’ भरणे बंधनकारक, नाहीतर नाव कट होणार!
अचूक माहिती द्या: बी.एल.ओ. कडून मतदारांना ‘गणना फॉर्म’ (Enumeration Form) दिले जातील. मतदारांनी आपली अचूक माहिती भरून हा फॉर्म देणे आवश्यक आहे. या सर्व फॉर्म्सचे पुढे संगणकीकरण केले जाणार आहे.
नाव वगळले जाण्याची भीती: जे मतदार आपले फॉर्म भरून देणार नाहीत, त्यांची नावे ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या ‘प्रारुप मतदार यादीत’ समाविष्ट केली जाणार नाहीत, याची मतदारांनी नोंद घ्यावी.
असे असेल पुढील वेळापत्रक:
३० जून ते २९ जुलै २०२६: बी.एल.ओ. कडून घरोघरी जाऊन पडताळणी व फॉर्म भरणे.
५ ऑगस्ट २०२६: प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी.
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६: मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी.
३ ऑक्टोबर २०२६: अंतिम मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी.
राजकीय पक्षांना सूचना, नागरिकांना आवाहान: > या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (माळशिरस विभाग, अकलूज) यांनी राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लोकशाही बळकटीकरणाच्या या राष्ट्रीय कार्यात सर्व नागरिकांनी आपल्या भागातील ‘बीएलओ’ यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



