सांगली जिल्हा विशेष माहिती

“~टाइम्स 9 मराठी न्यूज सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत मो. 8007932121~“`
सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा म्हणून सांगली जिल्हा ओळखला जातो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा मोठा वारसा जिल्ह्याला लाभला आहे. जिल्ह्यात मिरज,तासगाव,कवठेमहांकाळ,जत,आटपाडी,खानापूर,कडेगाव,पलूस, वाळवा आणि शिराळा हे १० तालुके आहेत. जिल्ह्यातून कृष्णा आणि वारणा या प्रमुख नद्या वाहतात. वारणा नदीवरील चांदोली धरण देखील जिल्ह्यात आहे.
सागंली जिल्ह्याचे सुपुत्र वसंतदादा पाटील यांनी राज्याचं नेतृत्त्व केलं आहे. वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार पाहिला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सातारच्या प्रतिसरकारची स्थापना देखील जिल्ह्यात झाली. सागंली जिल्ह्यातील काही भाग हा सागंली लोकसभा मतदारसंघ तर काही भाग हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. तर, जिल्ह्यात सांगली,मिरज,तासगाव- कवठेमहांकाळ,खानापूर-विटा,पलूस-कडेगाव,इस्लामपूर-वाळवा, शिराळा आणि जत हे विधानसभेचे मतदारसंघ आहेत.
जयंत पाटील, सुरेश खाडे, संजय काका पाटील ,विश्वजीत कदम गोपीचंद पडळकर,सदाभाऊ खोत, सत्यजीत देशमुख, सम्राट महाडिक, जयश्रीताई पाटील,रोहित पाटील हे प्रमुख नेते सध्या कार्यरत आहेत. सांगली जिल्ह्याचं क्षेत्रफळ ८ हजार ५७८ स्केवर किमी इतकं असून चांदोली अभयारण्य आणि सागरेश्वर अभयारण्य ही प्रमुख पर्यटनस्थळं आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख २० हजार ५७५ इतकी आहे. इथले शेतकरी प्रामुख्यानं ऊस,द्राक्ष आणि हळद शेती करतात.



