पिंपरी बुद्रुक येथे उन्हाळी हंगामातील भुईमूग काढणीला वेग, सेंद्रिय पध्दतीच्या पिकामुळे मागणी वाढली

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल -8378076123
मौसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी राजा शेतातील आपली कामे उरकून घेण्यात दंग झाला आहे. कांदा, भुईमूग, सुर्यफूल, बाजरी आदी पिके मजूर लावून काढून घेतली जात आहेत.

मौसमी पावसाळ्यातील रोहीणी नक्षत्र नुकतेच निघाले असल्याने वातावरणात बदल होवू लागला आहे. उष्णतेचा पारा ४० पार केल्याने उभी पिके जळून चालली आहेत. तर शेतातील उभी पिके वाचविण्यासाठी दोन दोन वेळेस पाणी दिले जात आहे. तरीसुद्धा अनेक पिकांना याचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.

सध्याला शेतात उभ्या असणाऱ्या सुर्यफुल, बाजरी, कांदा तसेच भुईमूग काढणीला वेग आल्याचे दिसत आहे. जरी दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका जास्त वाटत असला तरी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत शेतातील कामे उरकून घेतली जात आहेत. त्यामध्ये ज्यादा प्रमाणात मजूर लावून दोन दिवसांचे काम एकाच दिवसात उरकले जात आहे.

अशाच पध्दतीने पिंपरी बुद्रुक येथील बागायतदार केशव बोडके यांच्या शेतातील वेस्टर्न ५५ वाणाचे भुईमूगाचे पिके मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागल्याने त्यांच्यासह कुटूंबिय, गावातील महिला मजूर, मुले आदिंनी हसत खेळत पेरू बागेत लावलेल्या अंतर पिक भुईमूग काढण्यात आला. माळरानावर लावलेल्या भुईमूगाचे एकरी २० किलो बियांमध्ये तीन क्विंटल उत्पन्न निघाले. दोन दिवस उन्हात वाळवून त्याची किलोला ५० रूपये दराने विक्री करण्यात आली असल्याचे केशव बोडके यांनी सांगितले. सेंद्रिय पध्दतीने घेतलेल्या भुईमूग पिकास मोठी मागणी होती.



