ते ‘मी सावरकर गौरव यात्रा’ काढत आहेत.आम्ही ‘भगतसिंग-सुखदेव-राजगुरु-अशफाक उल्लाह खान विचार यात्रा’ काढू.—-ॲड.शीतल चव्हाण.

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क.
विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजांना माफीनामे लिहून इंग्रजांच्या कैदेतून स्वत:ची सुटका करुन घेतली. पुढे त्यांनी इंग्रजांकडून ‘पेंशन’ मिळवली. याकरीता आम्ही त्यांना ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून स्विकारत नाही.
भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, अशफाक उल्लाह खान या क्रांतिकारकांनी ऐन तारुण्यात इंग्रजांच्या विरुद्ध लढत लढत मरण पत्करले. हे तरुण ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणा देत हसत हसत फासावर चढले. या हुतात्म्यांचे हौतात्म्य जाणीवपूर्वक विसरले जाते. कारण, या शहीदांच्या नावाने कुठल्याही धर्म-जातीच्या अस्मितांचे राजकारण करता येत नाही. या हुतात्म्यांचा राष्ट्रवाद हा धर्मावर नव्हे तर लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर आधारित होता. म्हणूनच, आजच्या धार्मिक अस्मितांचे राजकारण करणाऱ्यांना या सच्च्या क्रांतिकारकांचा विसर पडतो.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ‘माफी मागायला मी सावरकर नाही, गांधी आहे’ असे जाहीर केले. राहुल गांधी यांचे विधान चुकीचे होते असे आम्हाला वाटत नाही. पण या विधानाला धरुन भारतीय जनता पक्ष व शिवसेना (शिंदे गट) हे “मी सावरकर गौरव यात्रा ” महाराष्ट्रभर काढत आहेत. संघ-भाजप परिवाराच्या या सांस्कृतिक राजकारणाला शह देण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ असमर्थ आहे. त्यांचे या मुद्यावर आपापसात एकमत नाही, हे या आघाडीतील नेत्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झाले आहे.
अशा परिस्थितीत संघ-भाजप परिवाराच्या सांस्कृतिक अजेंड्याला नाकारुन आम्हा तमाम संविधानवादी मंडळींचा सांस्कृतिक अजेंडा मांडण्यासाठी व पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करण्यासाठी आम्ही किमान आमच्या भागात काही केले पाहिजे या जाणीवेतून “भगतसिंग-सुखदेव-राजगुरु-अशफाक उल्लाह खान विचार यात्रा “काढण्याचे व त्याद्वारे या हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन करुन त्यांच्या विचारांचा जागर करण्याचे निश्चित केले आहे.
या यात्रेत सहभागी होवून संघ-भाजपाच्या धर्माधिष्ठित राष्ट्रवादाला आपण लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या संविधानाच्या मूलतत्वांवर उभ्या असलेल्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा प्रचार व प्रसार करुन उत्तर देवूया.या यात्रेत सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी आम्हाला संपर्क करावा. सर्वांच्या विचाराने यात्रेची तारीख, वेळ व मार्ग निश्चित केला जाईल.
आपलेच,
सर्व पदाधिकारी
प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय
आणि
ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशन
(संपर्क – 9921657346)



