“शिंदे डेअरी मालकाचे मनोज जरांगे पाटलांना निवेदन; मालमत्तेवरून ‘जोर-जबरदस्तीने दमदाटी’ आणि ‘बेकायदेशीर खोट्या गुन्ह्या’बाबत तक्रार”

पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
अकलूज: प्रतिनिधी सोमनाथ पवार
अकलूज येथील ‘शिंदे डेअरी’चे मालक नागेश शंकर शिंदे व लखन शंकर शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाला मालमत्तेच्या वादातून ‘बेकायदेशीर जोर-जबरदस्तीने दमदाटी’ आणि ‘खोटे गुन्हे’ दाखल करून त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज दादा जरांगे पाटील हे पश्चिम दौऱ्यावरती असताना दिनांक १३/०८/२०२६ रोजी अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. सदर पत्रकार परिषद झाल्यानंतर दिनांक २१ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या घटनेबाबत शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी व तोंडी स्वरूपात निवेदन सादर केले.

निवेदनातील माहितीनुसार, नागेश शिंदे यांनी आपली जमीन कायदेशीर प्रक्रियेने खरेदी केली होती आणि त्यावर त्यांचे नावही लागले होते. असे असतानाही, संबंधित व्यक्तींनी राजकीय व पैशाच्या जोरावर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धमकावण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून आणि त्यांना हाताशी धरून हे सर्व प्रकार घडवले जात असल्याचा संशय शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

“माझ्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे असतानाही, मला आणि माझ्या कुटुंबाला नाहक त्रास दिला जात आहे. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि आम्हाला जोर-जबरदस्तीने जमीन सोडून देण्यास भाग पाडले जात आहे,” असे नागेश शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे यांची कैफियत ऐकून घेतली आणि त्यांना सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी निवेदनाची सखोल चौकशी करून आणि कायदेशीर बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत.

हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा संशय आहे आणि यामुळे अकलूजमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या भूमिकेवरही शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि या प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.



