सोलापूरच्या राजकारणात खळबळ: भालकेंचा जयकुमार गोरेंना थेट इशारा, तर शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना ‘घरवापसी’चा सल्ला

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका मेळाव्याने जिल्ह्याच्या राजकारणात नवी ठिणगी टाकली आहे. या मेळाव्यात शहाजीबापू पाटील यांची खास फटकेबाजी आणि भगीरथ भालके यांचा आक्रमक पवित्रा चर्चेचा विषय ठरला आहे.
आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध असलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष देण्याची विनंती केली. बापू म्हणाले की,”सावंत सर, धाराशिव ही तुमची सासुरवाडी असेल, पण सोलापूर जिल्हा हे तुमचे मूळ घर आणि माहेर आहे. २०१९ मध्ये जसे मुख्यमंत्री महोदयांनी तुम्हाला सोलापूरची जबाबदारी दिली होती, तशीच आताही द्यावी. तुम्ही जर सोलापूरकडे पुन्हा गांभीर्याने पाहिले, तर जिल्ह्यात शिवसेनेचे किमान ४ ते ५ आमदार सहज निवडून येतील.”
तानाजी सावंत सध्या धाराशिव जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करत असल्याने बापूंनी त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्याची आठवण करून देत पक्ष विस्तारासाठी साद घातली आहे.
शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्यानंतर भगीरथ भालके यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी गोरेंनी भालकेंवर टीका करताना म्हटले होते की, “भालके निवडून आले तरी निधीसाठी त्यांना माझ्याकडेच यावे लागेल.”
या टीकेला उत्तर देताना भालके मंचावरील मुख्यमंत्री शिंदेंकडे बोट दाखवत म्हणाले:”पालकमंत्री विचारत होते की भालके निधी कुठून आणणार? तर हे बघा, निधी देणारा सर्वात मोठा माणूस (एकनाथ शिंदे) आज माझ्यासोबत मंचावर बसला आहे. आता निधीची कसलीही कमतरता भासणार नाही.”
भगीरथ भालके यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात भाजप विरुद्ध शिवसेना असा अंतर्गत सामना रंगण्याची चिन्हे आहेत. सत्तेत एकत्र असूनही स्थानिक वर्चस्वासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना शिंगावर घेतल्याने आगामी नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सोलापूरचे राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.



