सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; मुख्य प्रवेशद्वारासमोरच अस्वच्छतेचा बोजावारा

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
सोलापूर: शहरातील अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. कारागृहाच्या गेटसमोरच कचऱ्याचे ढीग आणि सांडपाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, प्रशासनाच्या या कारभारावर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्हा कारागृहाच्या मुख्य गेटमधून दररोज अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि कैद्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी कायद्यांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था देखील केलेली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे कायद्यांच्या भेटीगाठीसाठी येणाऱ्या नागरिकांना प्रतिक्षालय बांधण्यात आलेला असून त्या प्रतीक्षालया मध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट मात्र, याच मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर गेल्या काही दिवसांपासून कचरा साचला आहे. या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात चिखल आणि दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. येथेच असणाऱ्या शौचालयामध्ये दुर्गंधी सुटलेले आहे यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे सरकार ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून स्वच्छतेचा संदेश देत आहे, तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांच्या परिसरातच अस्वच्छता पाहायला मिळत आहे. कारागृह प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, कारागृहाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा परिसर मोकळा आणि स्वच्छ असणे गरजेचे असताना, प्रवेशद्वारासमोरच अस्वच्छता असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागत आहे.


या अस्वच्छतेमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासन आणि कारागृह प्रशासन या दोघांनीही एकमेकांकडे बोट न दाखवता, तातडीने या परिसरातील कचरा उचलून स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरत आहे.



