डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शांतता आणि समानतेचे मूल्य शिकवले – राजाराम गुजर

Times 9 Marathi News Network
वेळापूर : “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक न्याय, समानता आणि वंचितांच्या उत्थानासाठी समर्पित केले. त्यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर देशाला मजबूत संविधान आणि लोकशाही देऊन शांतता व समानतेचे मूल्य शिकवले,” असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते राजाराम गुजर यांनी केले.
वेळापूर येथील मुलींच्या शाळेत आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ. मनीषा भानवसे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून औदुंबर माने व पत्रकार बाळासाहेब बनसोडे उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात गुजर सर पुढे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी शिक्षण आणि उपेक्षित वर्गाच्या सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. जातीय भेदाभेदाविरुद्ध लढा देऊन त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांचे कार्य कोणत्याही विशिष्ट जाती-धर्मापुरते मर्यादित नसून, त्यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेच आज त्यांचे नाव जगाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरले गेले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी यांच्या प्रास्ताविकाने झाली. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थिनींची भाषणे झाली. तसेच विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चव्हाण सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती किरण घाडगे मॅडम यांनी मानले. याप्रसंगी श्रीमती आसराबाई जैन, श्री. पांडुरंग कुलकर्णी, कविता आवटे मॅडम यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



