भटक्या-विमुक्तांना जात प्रमाणपत्रासाठी १४ एप्रिलला ‘अन्नत्याग तंबू आंदोलन’

नगरसेवक महेश शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; अकलूज प्रांत कार्यालयात दिले निवेदन
Times 9 Marathi News Network
अकलूज : भटक्या व विमुक्त जाती-जमातीतील (VJNT) शेकडो कुटुंबांना कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे हक्काच्या जात प्रमाणपत्रांपासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक तोडगा न काढल्यास, येत्या १४ एप्रिल रोजी ‘अन्नत्याग तंबू आंदोलन’ छेडण्याचा खणखणीत इशारा नगरसेवक महेश शिंदे यांनी दिला आहे.
या संदर्भात मंगळवारी अकलूज येथील प्रांत कार्यालयाला विशेष निवेदन सादर करण्यात आले.

भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने जात प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे हा समाज शासकीय योजना, शिक्षण आणि आरक्षणापासून दूर फेकला जात आहे, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला खिळ बसत आहे.
जातीच्या दाखल्यासोबतच आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर आवश्यक ओळखपत्रे मिळवण्यासाठी या कुटुंबांना प्रचंड कसरत करावी लागत आहे.
”भटक्या-विमुक्त समाजाचा विकास केवळ कागदपत्रांच्या अभावामुळे थांबला असेल, तर ते दुर्दैवी आहे. प्रशासनाने केवळ नियमांवर बोट न ठेवता, या कुटुंबांना न्याय देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. अन्यथा, १४ एप्रिलला आंदोलनाशिवाय पर्याय नाही.”— महेश शिंदे (नगरसेवक)

हे निवेदन भारतीय जनता पार्टी आणि ‘मैत्री फाउंडेशन सामाजिक व शैक्षणिक संस्था’ संचलित भटक्या-विमुक्त जाती-जमाती हक्क समितीच्या वतीने देण्यात आले. नगरसेवक महेश शिंदे हे सातत्याने या प्रश्नावर पाठपुरावा करत असून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहेत.
यावेळी निवेदन देताना महेश शिंदे यांच्यासह चैतन पवार, नवनाथ साठे, दत्ता पवार, तुषार थोरात, शंकर मस्के, अमोल माने, सज्जन लोखंडे यांसह समाजातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



