सामाजिक

नागरी सेवा-सुविधा न देणाऱ्या करमाळा पालिकेचे कर नागरिकांनी भरू नये : येवले यांचे आवाहन

करमाळा(प्रतिनिधी) – स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य,रस्ते आदी कुठल्याही नागरी सुविधा न पुरविणाऱ्या करमाळा नगरपरिषदेकडून आकारले जाणारे कुठल्याही स्वरूपाचे कर शहरातील नागरिकांनी भरू नयेत असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार, मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी शहरातील करदात्या नागरिकांना केले आहे. याविषयी बोलताना येवले हे म्हणाले,गेल्या अनेक वर्षांपासून करमाळा हे दिवसेंदिवस बकाल व घाणेरडे शहर म्हणून ओळखले जाऊ लागलेले आहे.सार्वजनिक स्वछता व आरोग्य याबाबतीत तर कहरच झालेला आहे.जागोजागी साठलेले कचरा,प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग,तुंबलेल्या गटारी,गटारीतील गाळ कधीतरी काढून रस्त्यावरच टाकण्याची पध्दत,हजारोंच्या संख्येने कुत्री,डुकरे,गायी या मोकाट जनावरांचा सर्वत्र असणारा वावर-उपद्रव व या जनावरांमुळे जागोजागी वाहतुकीस होणारा अडथळा,शहरात सर्वदूर कायमचे पसरलेले धूळ व घाणीचे साम्राज्य,डासांचा त्रास यांमुळे श्वसनाचे व साथीच्या रोगांचे वाढते प्रमाण यांमुळे शहरात रहाणाऱ्या नागरिकांना जगणेच दुरापास्त व्हायला लागलेले आहे.कर्जत रोड,जुन्या नगर बायपास रोडवरुन पूर्वेकडे जाणारा जुना निलज रोड हे रस्ते तर प्लॅस्टिक व अन्य कचऱ्याचे डेपोच झालेले आहेत.शहरातील अरुंद रस्त्यांवर विशेषतः मेनरोड, एसटी स्टँड परिसर,राशीन पेठ,गुजर गल्ली, भवानी व मंगळवार पेठ परिसरात स्थानिक व्यापाऱ्यांनी रस्त्यांवर केलेली अतिक्रमणे,त्या-त्या भागात रहाणाऱ्या रहिवाशांनी रस्त्यावर कायमस्वरूपी उभी केलेली चारचाकी, दुचाकी वाहने,शहर परिसरात रोज नवीन होत असलेली अतिक्रमणे या कारणांमुळे शहरातील वाहतुकीचा व पादचाऱ्यांच्या रस्त्याने चालण्याचा प्रश्न जटिल बनला आहे.गेल्या दोन-सव्वादोन वर्षांपासून पालिकेवर प्रशासक आहे,मात्र प्रशासक असलेले माढा उपविभागीय अधिकारी,पालिकेचे मुख्याधिकारी हे शहरातील समस्यांची पाहणी करण्यासाठी चुकूनसुद्धा शहरात फिरकत नाहीत.संवेदनहीन अधिकारी व प्रशासन व मिल-बांटके खाणारे पालिकेचे लोकनियुक्त प्रतिनिधी यांच्यामुळे गेल्या काही वर्षांत शहराची अक्षरशः वाट लागलेली आहे.विविध योजनांसाठी येणाऱ्या करोडो रुपयांच्या निधींपैकी जवळपास चाळीस टक्के रकमेचा अपहार होत असेल विकासकामांचा दर्जा कसा असणार व आहे हे करमाळावासीय गेल्या अनेक वर्षांपासून उघड्या डोळ्यांनी पण निमूटपणे सहन करत आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे आता थांबवणं गरजेचे आहे. त्यामुळं निष्क्रिय,भ्रष्ट्र प्रशासन आणि अधिकारी यांना वठणीवर आणण्यासाठी कर न भरण्याचे असहकार आंदोलन नागरिकांनी सुरू करावे असे आवाहन करून यासंदर्भात नागरिकांच्या वतीने लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे येवले यांनी सांगितले.आगामी पालिका निवडणुकीत घराणेशाही,सत्तेची मक्तेदारी मोडून काढून समविचारी मंडळींनी एकत्र येऊन स्वच्छ प्रतिमेच्या,शहर विकासाची तळमळ असलेल्या नव्या चेहऱ्यांना निवडून आणणे गरजेचे असल्याचे येवले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button