विशेष

निसर्गाचे संवर्धन हीच काळाची गरज-प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार

प्रतिनिधी राहुल गायकवाड

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. दरवर्षी ‘२८ फेब्रुवारी’ हा दिवस प्रसिद्ध भारतीय भौतिक शास्रज्ञ डॉ सी व्ही रमण यांच्या ‘प्रकाशाचे विकिरण’ या संशोधन बद्दल ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्व:हस्ताक्षरात लिहिलेल्या विज्ञान विषयक माहिती,लेख,कविता यांचे संकलन करून तयार केलेल्या ‘विज्ञानझेप’ या अंकाचे प्रकाशन, नामवंत शास्त्रज्ञांची माहिती असलेल्या विज्ञान विषयक भित्तिपत्रकाचे अनावरण तसेच विज्ञान विषयक प्रश्नमंजुषा ‘कौन बनेगा वैज्ञानिक’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ‘शिवरत्न नॉलेज सिटी’ चे प्राचार्य प्राणीशास्त्र विषयांचे संशोधक, निसर्ग प्रेमी डॉ. अरविंद कुंभार हे उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर अभिरूप शास्त्रज्ञ म्हणून सी व्ही रामण, रामानुजन, मेरी क्यूरी, शकुंतला देवी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात थोर भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रामन ,माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी केले. त्यांनी सर्वांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विज्ञान विषयक माहिती सांगताना सी. व्ही.रामन यांच्या संशोधन कार्याची व ‘रमण इफेक्ट’ ची माहिती सांगितली. यानंतर प्रमुख मान्यवर कुंभार सर यांच्या शुभहस्ते ‘विज्ञानझेप’ या अंकाचे प्रकाशन व विज्ञान भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. तसेच ‘सायन्स ओलंपियाड फाउंडेशन’ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या ‘नॅशनल सायन्स ओलंपियाड’ या परीक्षेत सुवर्णपदक पटकवलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

तसेच ‘सावंतवाडी’ येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात ‘ऑटो इरिगेशन सिस्टीम’ या उपकरणाची निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यवसाय विभागाकडील सर्व विज्ञान शिक्षकांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. यानंतर विद्यार्थी भाषणात कु. साक्षी वाघमारे हिने तर शिक्षक मनोगतामध्ये ज्योती शिंदे मॅडम यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विज्ञान विषयक माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे डॉ. कुंभार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैज्ञानिक क्रांती सोबत मानव जसजसा प्रगती करत चालला आहे तशी निसर्गाची हानी होत चालली आहे याकडे आपण दुर्लक्ष करत चालला असल्याचे सांगितले. ग्लोबल वर्मिंग, प्रदूषण याच्या विळख्यात मानव विनशाकडे चालला असून वेळीच उपाय न केल्यास पृथ्वीच्या ऱ्हासला जगाला सामोरे जावे लागेल यामुळे पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वतःपासून सर्वांनी स्वीकारावी तसेच विज्ञाननिष्ठ बना परंतु निसर्गाचे संतुलन राखा असा मौलिक सल्लाही दिला.

खास विज्ञान दिनाचे औचत्य साधून घेतलेल्या ‘कौन बनेगा वैज्ञानिक’ या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये डॉ. होमी भाभा हा गट प्रथम तर डॉ. रामानुजन या गटाने द्वितीय क्रमांक पटकवला. एकूण पाच गटांचा समावेश असलेल्या या गटांना शास्त्रज्ञांची नावे देण्यात आली होती. सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आली. तसेच प्रेक्षक विद्यार्थ्यांमधून अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बक्षीसे देण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ.अरविंद कुंभार सर यांनी स्वतः लिहलेल्या ‘पक्ष्याची दुनिया’ हे पुस्तक विद्यालयास भेट दिले. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी शिक्षक शिक्षकेत्तर, विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षकांनी कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यास्मिन शेख, प्रश्नमंजुषेचे सूत्रसंचालन श्रीष देवस्कर, रुपाली नवले , निकालचे वाचन दिपाली लोखंडे, कल्पना जाधव, सुभाष मुंडफने यांनी केले. गुणलेखनाचे काम लक्ष्मी अस्वरे,भक्ती तावरे यांनी केले. आभार दत्तात्रय घंटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button