संपादकीयसामाजिक

सुभाष चौकाचे नामांतर करण्यात येऊ नये: सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील सुभाष चौकाचे नाव बदलण्यात येऊ नये अशी मागणी करणारे निवेदन आज सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले.अयोध्येतील व करमाळा येथील वेताळपेठ राममंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने सुभाष चौकाचे नाव बदलून ते श्रीराम चौक करण्यात यावे अशी मागणी भाजप,शिवसेनेच्या(शिंदे गट) काही कार्यकर्त्यांनी नगरपालिकेकडे केली होती आणि त्यानंतर येत्या २२ जानेवारीला सुभाष चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून या चौकाचे नामांतर करणार असल्याचे संबंधितांकडून जाहीर करण्यात आलेले आहे.या पाश्र्वभूमीवर आज विविध पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यावेळच्या स्वातंत्र्यप्रेमाने भारावलेल्या युवापिढीने शहरातील या मुख्य चौकाला या महान क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ दिलेले नाव रूढ झाले व पालिकेकडे या चौकाच्या नावाची तशी अधिकृत नोंद आहे.त्यामुळे या चौकाचे नाव बदलणे हा सुभाषचंद्र बोस यांच्या देशकार्याचा व हौतात्म्याचा अवमान ठरेल.सुभाष चौकाचे ऐतिहासिक नाव बदलण्याऐवजी चौकाला लागून असलेल्या राशीन पेठेला श्रीराम पेठ असे नाव देण्यात यावे असेही या निवेदनाद्वारे सुचविण्यात आलेले आहे.यावेळी माजी नगरसेवक रामकृष्ण माने,मकाईचे माजी संचालक विवेक येवले,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप,माजी पं.स.सदस्य ऍड. राहुल सावंत,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष संतोष वारे,शहराध्यक्ष ऍड.शिवराज जगताप,राष्ट्रवादीचे हनुमंत मांढरे पाटील, शिवसेना शहर प्रमुख संजय शिंदे ,माजी नगरसेवक फारूक जमादार,गोवर्धन चवरे-पाटील,मराठा सेवा संघाचे सचिन काळे,नितीन चोपडे,भीमदलाचे सुनील भोसले आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी भीमदलाच्या वतीनेही निवेदन देण्यात आले. माढा उपविभागीय अधिकारी कुर्डुवाडी, पोलीस निरीक्षक करमाळा,मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद यांनाही यावेळी निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button