करमाळा शहर व तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आता करमाळा तालुका मित्र मंडळाची स्थापना,, नवोदित युवा पत्रकार विशाल घोलप यांची संकल्पना ,,

करमाळा प्रतिनिधी आलीम शेख
शहर आणि तालुक्यातील नागरी सुविधांबाबत सध्या सामान्य नागरिकांची कमालीची गैरसोय होताना दिसत आहे. अधिकाऱ्यांची रिक्त पदे, विविध कार्यालयांतील ढिसाळ कारभार आणि लाचखोरी, प्रशासक असलेल्या स्थानिक संस्थांमधील गलथान कारभार आणि यापासून अनभिज्ञ असलेल्या लोकप्रतिनिधींची उदासीनता यांमुळे सामान्य जनता जेरीस आली आहे. कोणत्याही असुविधेबाबत एकट्या-दुकट्याने आवाज करण्यासाठी लोक धजत नाहीत आणि जरी कोणी तसा प्रयत्न केला तर त्याचा फारसा परिणाम होत नाही.
यावर करमाळा शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विशाल घोलप यांच्या संकल्पनेतून ‘करमाळा तालुका मित्र मंडळ’ या समूहाची निर्मिती करण्यात आली असून शासकीय कार्यालयांतील प्रलंबित कामांना गती देण्यासाठी तसेच पाठपुराव्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी whats app ग्रुपची निर्मिती करून त्यात शहर आणि तालुक्यातील त्या त्या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांचे मोबाईल नंबर उपलब्ध करण्यात आले आहेत. या ग्रुपची निर्मिती करताच या ग्रुप वर शहर आणि तालुक्यातून समस्यांचा भडीमार सुरु झाला आणि संबंधित कार्यकर्त्यांनी त्या त्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून समस्यांचा निपटारा करण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील अस्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, मोकाट जनावरांचा उच्छाद, जंतुनाशक आणि डास प्रतिबंधक फवारणी उघड्या गटारांवरील लोखंडी झाकणे, खेळाच्या मैदानांची स्वच्छता, शहरातील प्रमुख मार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे, घंटागाडीची अनियमितता, कित्येक वर्षांपासून बंद गटारी आदींबाबतचा पाढाच नागरिकांनी या ग्रुपवर टाकला. त्यामुळे मंगळवार दि. १० रोजी करमाळा मित्र मंडळाच्या सदस्यांनी नगर पालिकेस भेट देऊन या समस्यांबाबतचे निवेदन दिले. यावेळी सक्षम अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच मुख्याधिकारी, संबंधित अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि ग्रुपचे सदस्य यांची बैठक लावून सकारात्मक उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले गेले आहे.
हे निवेदन देतेवेळी विशाल घोलप, दीपक चव्हाण, गणेश फलफले, ना.भ. माने, हेमंत बिडवे, फारूक जमादार, प्रमोद फंड, अक्षय बनकर, आझाद शेख आणि विशाल परदेशी उपस्थित होते.



