बावडा गावासाठी १३ कोटीची सुधारीत पाणीपुरवठा योजना लवकरच – माजी मंत्री भाजपा नेते हर्षवर्धन पाटील. गणेशवाडी येथील विविध विकास कामांसाठी एक कोटी ५० लाखांचा निधी

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल 8378081147
बावडा गावासाठी १३ कोटीची सुधारीत पाणीपुरवठा योजना एका आठवड्यात मंजूर होणार असून त्यामध्ये गणेशवाडीचा समावेश करण्यात आला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.
गणेशवाडी येथे एक कोटी ५० लाखांच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते अशोक घोगरे, उदयसिंह पाटील, अंकिता पाटील ठाकरे, मनोज पाटील, विकास पाटील, मयूर पाटील, बापू शिंदे, हरिभाऊ घोगरे, बाळासो घोगरे, मुनीर आतार, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, ग्रामसेविका अंबिका पावसे, विठ्ठल घोगरे, नामदेव घोगरे, मयुर घोगरे, निलेश बोडके, राजेंद्र मगर, फणिंद्र कांबळे, उमेश घोगरे, सुनिता साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, भिमा नदीवरील नरसिंहपूर, टणू व भाटनिमगाव बंधाऱ्याची सहा ते सात ढापे पाणी वाहते तोपर्यंतच टाकून ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणी अडवण्याचे नियोजन अधिकाऱ्यांना बोलून करण्यात येणार आहे. दोन्ही कारखान्याचे बिल देण्यास उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त दर कसा देता येईल याचे नियोजन करण्यात आले आहे. निरा भिमा कारखान्यात सध्याला ६० हजार लिटर प्रतिदिन ईथीनाॅल निर्मिती करत असून त्याला असणारी मागणीमुळे जास्तीच्या वाढीव निर्माणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
बावडा गावाची लोकसंख्या २० हजारांच्या घरात असून १३ हजार मतदार व २३ विविध जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. एक एक वार्ड हे एका एका गावा एवढे मोठे आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त घरकुले कुठे मिळाली असतील तर ते बावडा गावात गायरानात १२०० घरकुले मिळाली आहेत. जेव्हा जेव्हा आपण आमच्यावर विश्वास व्यक्त केला, जबाबदारी दिली त्याला कुठेही तडा जाऊ न देण्याचे काम आम्ही केले आहे. बावडा गाव म्हणजे शक्तीस्थळ असणारे गाव आहे. गावच्या माणसापेक्षा बाहेरच्यांना जास्त गुदगुल्या वाटत आहेत. पण आपण ग्रामस्थ जर एकत्र राहीलो तर बाहेच्यांचे काही चालणार नाही.

गणेशवाडी ग्रामस्थांसाठी हायमास्ट दिवा देण्यात येईल. सुजित घोगरे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याला दहा लाख वाढीव देण्यात येतील. तर गणेशवाडी ते सातपुते वस्तीसाठीचा रस्ता ९० लाखात होणार नाही त्यासाठी वाढीव निधी देण्याची तरतूद करण्यात येईल. कुदळे वस्ती रस्त्याला निधी देण्यात येईल. सुरेश बापू, शहाजी बापू असताना ग्रामपंचायत बिनविरोध व्हायची पण आमच्या व अशोक भाऊच्या काळात थोड्या इकडच्या तिकडच्या विरोधामुळे निवडणूका व्हायच्या. त्यामुळे गावाच्या विकासासाठी मागील वेळेस मी व अशोक भाऊंनी बसून ग्रामपंचायत बिनविरोध केली. बावडा ग्रामपंचायत कारभार किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे चालवण्यात आला. एकवेळ आमदारकी, मंत्रीपद चालवणं सोप आहे पण गावचा गावगाडा चालवणं रोजच्या कटकटीने अवघड काम असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ नेते अशोक घोगरे, आकाश घोगरे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच किरण पाटील यांनी सुत्रसंचलन अमर निलाखे यांनी तर आभार गणेश घोगरे यांनी मानले.



