आगरी समाजोन्नती संघा तर्फे १० वी- १२ वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वैभव पाटील : प्रतिनिधी पालघर
पालघर तालुक्यातील मायखोप साई मंदिरात आगरी समाजोन्नती संघ, पालघर तर्फे इयत्ता दहावी- बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. इ. १० वी च्या ८०% पेक्षा अधिक गुण व १२ वी च्या ७०% पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या २७ विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजन घरत सर होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपला गुणगौरव करण्याचा एकमेव उद्देश हाच की ज्या समाजात आपण जन्माला येतो त्या समाजाचे ऋण फेडण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. तुम्हीही शिकून मोठे व्हाल तेव्हा आपल्या कमाईतील खारीचा वाटा समाजासाठी खर्च करावा व समाजाचे ऋण फेडत आशीर्वाद प्राप्त करावा. प्रमुख अतिथी मांडे-विठ्ठलवाडी गावचे सरपंच महेंद्र पाटील सर म्हणाले की आपला सन्मान आपल्याला सदैव प्रेरणा देत सकारात्मक ऊर्जा प्रदान करीत असतो.

सकारात्मक दृष्टीने भावी यशाची वाटचाल करीत रहा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक त्रिमूर्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. जगदीश किणी यांनी केले. तर प्रा. हेमंत पाटील, मोरेश्वर घरत, किणी गुरुजी, यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रसंगी साई मंदिराचे ट्रस्टी उमेश कारभारी, शैलेश पाटील, किशोर भोईर व माता पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रेय भोईर यांनी केले.



