भाजप सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा – डॉ अर्चना पाटील

बावडा, प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123
केंद्र व मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ अर्चना पाटील यांनी केले.
पिंपरी बुद्रुक ( ता. इंदापूर ) येथे भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ अर्चना पाटील यांनी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हा कार्याध्यक्ष आबासाहेब थोरात, सुरेश बोडके, निलेश बोडके, अमोल बोडके, युवराज गायकवाड, अण्णा पाटील, भाजपचे माजी युवा मोर्चाचे पदाधिकारी युवराज बोडके आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. अर्चना पाटील पुढे म्हणाल्या, भाजप सरकार हे जनतेचे सरकार आहे, मोदी सरकारने अनेक चांगल्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत राबवण्याचा प्रयत्न केला आहे, कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील बूथ सक्षम करावेत असे शेवटी त्यांनी सांगितले.
यावेळी पक्षाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची भाजपा कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली. आम्ही भाजपचे जुने पदाधिकारी आहोत सत्ता नसताना आम्ही निष्ठेने पक्षाचे काम केले आहे यापुढेही करत राहणार आहे. आम्हाला योग्य सन्मान दिला जावा अशीही खंत यावेळी पदाधिकाऱ्यांनी डॉ अर्चना पाटील यांना बोलून दाखवली. त्यावेळी डॉ अर्चना पाटील यांनी भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असे सांगितले.




