महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी आप ची स्वराज्य यात्राविठुरायाचे दर्शन घेऊन “स्वराज्य यात्रा” ची सुरुवात

विठ्ठलाचरणी प्रार्थना, खोके सरकारला सुबुद्धी मिळो आणि महाराष्ट्रातील जनतेला ही बळ मिळो
इंदापूर, प्रतिनिधी, एस. बी. तांबोळी, मोबाईल – 8378081147
राज्यातील पन्नास खोक्यांचे सरकार तग धरून बसलेले आहे, ते लोकशाहीसाठी अत्यंत अपायकारक आहे. आज कांद्याला योग्य भाव मिळत नाही, कापूस विकला जात नाही तरीसुद्धा सरकारला दयामाया उरली नसून हे सरकार निष्टुर काळजाचे झाले असल्याची टीका आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या प्रीती शर्मा मेनन यांनी स्वराज्य यात्रा दरम्यान माध्यम प्रतिनिधीशी बोलताना केली.
आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय नेत्यांच्या तसेच प्रभारी दिपक सिंघला तसेच सह-प्रभारी गोपाल इटालिया ह्यांच्या निर्णयानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर “स्वराज्य यात्रा” काढणार आहोत. स्वराज्य यात्रेची सुरुवात पंढरपूर येथून झाली असून ती रायगड पर्यंत सुरू राहणार आहे. पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वराज्य यात्रेची सुरुवात करण्यात आली.

स्वराज्य यात्रेत प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, खोके सरकार खूप मोठमोठ्या घोषणा करतात पण जमिनीवर काम काही होत नाही. आज कांद्याला योग्य भाव मिळत नाही, कापूस विकला जात नाही तरीसुद्धा सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेची काहीच दयामाया नाही. आम्ही विठ्ठलाचरणी हीच प्रार्थना केली आहे की, ह्या सरकारला सुबुद्धी मिळो आणि महाराष्ट्रातील जनतेला ही बळ मिळो जेणेकरून ह्या जुलमी सरकारला सत्तेबाहेर जनता काढतील आणि एका खऱ्या अर्थाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य इथे स्थापन होईल.
पुढे बोलतांना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, ह्या यात्रेमागचा मूळ उद्देश हा लोकांना जोडण्याचा आहे आणि लोकांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांची उजळणी करून देणेचा आहे. जनता ह्या पन्नास खोक्यांच्या सरकारपुढे हताश झालेली आहे. जनतेला त्यांचे स्वातंत्र्य परत मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या मताचे मोल काय आहे ह्याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी आम्ही ही यात्रा काढत आहोत. आमचे महाराष्ट्राचे सर्व नेते, सह-प्रभारी गोपाळ इटालिया ह्यांच्या मार्गर्शनाखाली इथून रायगड पर्यंत जाऊन लोकांना जागृत करणार आहेत, असे मत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले.
आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील आगामी सर्व स्थानिक निवडणुका, तसेच लोकसभा आणि विधानसभा निडणुकाही लढणार असल्याचे वक्तव्य प्रीती शर्मा मेनन यांनी केले. भाजपचा दुटप्पीपणा समोर आणत त्या म्हणाल्या की भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते. त्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी भाजप विरूद्ध एकवटले पाहिजे, ह्यात काहीच दुमत नाही, असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.
दरम्यान या स्वराज्य यात्रेत मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष रुबेन मस्करन्हस, मुंबई उपाध्यक्ष मेहमुद देशमुख, पायस वर्गीस उपस्थित होते.



