तांबड्या मातीला घाम फोडणार एक नाव- “खाशाबा”- महेश बजरंग कोळेकर

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
“कुस्ती” म्हंटल की डोळ्यासमोर येते लाल माती आणि पिळदार दंड असणारा पैलवान. याच महाराष्ट्राच्या मातीत अनेक पैलवान घडले. घडत आहेत आणि घडणार ही आहेत. कारण ही माती शूरवीरांना जन्म घालणारी माती आहे. कृष्णामाईच्या निळ्याशार पाण्यावर हृदय तरंगाव अस इथल्या प्रत्येकांच जीवन आहे. पूर्ण नाव खाशाबा दादासाहेब जाधव. नावातच खास गोष्ट होती मग जीवनात का नसेल.
लहान पणापासून कुस्तीच वेड. आणि बरच काही. माणूस जन्माला येतो खरा पण परिस्थितीचे चटके सहन करून वाढतो आणि आपली स्वप्न पूर्ण करतो. खाशाबा जाधव यांचा जन्म सातारा मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई असे होते. स्वातंत्र्यानंतर भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिलं वयक्तिक पदक मिळवुन देणारे जर कोण असतील तर ते होते “खाशाबा”. कांस्यपदक आणि खाशाबा हे नाव जणू त्या काळी खूप चर्चेत होत.

त्यातच सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, मराठी चित्रपट निर्माते श्री. नागराज मंजुळे सर यांनी “खाशाबा” यांच्या जीवनावर चित्रपट काढायचा निर्णय घेतला. ही खूप गौरवाची गोष्ट आहे समस्त महाराष्ट्र साठी कुस्तीप्रेमीसाठी आणि आपल्या सर्वांसाठी. आजतागायत आपण पाहतोय की, कुस्तीचे चित्र सुद्धा दिवसेंदिवस बदलत चालले आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र केसरी ची लढत ही झाली.
त्यानंतर बऱ्याच काही चर्चा, अफवा रंगल्या. या महाराष्ट्राच्या मातीत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत फक्त एकच नाद तो म्हणजे “कुस्ती”. आपलं जीवन हे खूप लहान मोठ्या अडचणींनी भरलेलं आहे. पण जो त्या अडचणी समोर दंड थोपटून उभा राहिला तोच या आयुष्यात जिंकला. स्वतःला पैलवान म्हणवून घेणं वाटत तितकं सोप्प काम नाही. किंवा नावासमोर पै. लावलं म्हणून पैलवान होत नसतो. त्यासाठी मरावं लागतं त्या लाल मातीत खापाव लागत.

आपल्या वस्ताद चा आदर करावा लागतो. नाहीतर वस्ताद एक डाव कायम राखून ठेवतोच की स्वतःसाठी आणि उंडारलेल्या पैलवान साठी. जिद्द, मेहनत, अचूक निर्णय आणि योग्य ठिकाणी योग्य डाव जो वापरतो तो असतो खरा पैलवान. ज्या खाशाबा जाधव यांनी आपलं अवघ आयुष्य कुस्तीसाठी आणि आपल्या भारत देशासाठी घालवल आज त्या महान पैलवान माणसाच्या आयुष्यावर एक मराठी चित्रपट येतोय ही खरच खूप मोठी गोष्ट आहे. बाकी पैलवान आणि वस्ताद मंडळींना खूप काही शिकण्या सारख असेल यामधून अस मला प्रामाणिकपणे वाटत.
गावापासून सुरू झालेला प्रवास ऑलिम्पिक मध्ये संपतो. किती कष्ट, किती यातना, किती मेहनत, किती जिद्द, किती चिकाटी, किती आत्मविश्वास असेल त्या माणसात आणि त्याच्या कर्तृत्वात. अशी माणसे कधीही मरत नसतात. तर त्यांच्या खेळामधून त्यांच्या विचारामधून त्यांच्या कर्तृत्वातुन ती कायम सदैव जिवंत असतात तुमच्या माझ्या सारख्या जनसामान्यांमध्ये ती ही जशीच्या तशी अविरत.

आज मी एक लेखक म्हणून श्री. नागराज मंजुळे सरांचं मनापासून कौतुक करतो त्यांना धन्यवाद करतो त्यांचं आभार मानतो की, संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा त्यांनी हा चित्रपट बनवावा आणि संपूर्ण जगाने आणि इतिहासाने या चित्रपटाची आणि “खाशाबा” नावाच्या असामान्य कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तीची नोंद घ्यावी. इथल्या प्रत्येक घराघरात किमान एकतरी खाशाबा जन्माला यावा. मन , मेंदू, आणि मनगट मजबूत असणारा खाशाबा प्रत्येक घरात जन्माला यावा. पैलवान यादीमधील सर्वात वरच नाव म्हणजे “खाशाबा”. पुन्हा प्रत्येक पैलवानांच्या धमन्यात रक्तात दिसावा. असा डाव प्रत्येक पैलवानांनी शिकावा.
लेखक- महेश बजरंग कोळेकर
गाव- काक्रंबावाडी ता-तुळजापूर जि-धाराशिव.
संपर्क-9146133047



