सर्वसामान्य माणसाचा बुलंद आवाज आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी पडद्याआड

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
आगरी समाजाने संघटित होऊन शौर्याचा व्यापार थांबवावा पराक्रम सत्कारणी लावा प्रगतीच्या वाटा शोधण्यासाठी जगाबरोबर धावा असा मूलमंत्र आगरी समाजाला देणारे व अन्याय सहन करू नका आणि अन्याय करू नका अशी शिकवण देणारे आगरी सेना संस्थापक आणि अध्यक्ष तसेच ओबीसी महामंडळाचे पहिले अध्यक्ष राजाराम साळवी यांचे शनिवार दिनांक 6 जून रोजी उपचारादरम्यान ठाणे कळवा येथे निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे वय 80 वर्ष होते.
त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील आगरी समाजात शोककळा पसरली आहे. त्यांचे अंत्यसंस्कार रविवार दिनांक 7 जून रोजी करण्यात येणार आहेत. एक आगरी झुंजार नेता विचारी शांत स्वभावाचा आपल्या आगरी समाजासाठी आणि समाजाला एकत्र आणण्यासाठी राजाराम साळवी शेवटच्या श्वासापर्यंत वाघासारखे लढले त्यांचे आगरी समाजाला प्रोत्साहन बळ आणि ऊर्जा देणारे समाजाच्या हिताचे शेवटचे राजकीय भाषण शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी सफाळे विराथन बुद्रुक येथील आगरी सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करताना झाले. त्यांचा जन्म 16 एप्रिल 1946 रोजी ठाणे येथील कळवा गावात झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव राजाराम जानकीबाई रामा साळवी त्यांचे वडील रामा साळवी यांची ठाणे कळवा गावात प्रतिष्ठित व्यक्ती अशी प्रतिमा होती.

राजाराम साळवी यांची पत्नी एक मुलगा आणि दोन मुली आणि सुनबाई नातवंडे असा परिवार आहे. राजाराम साळवी यांनी आगरी सेनेची स्थापना 1 ऑगस्ट 1986 रोजी केली. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड नवी मुंबई पनवेल या भागात त्यांनी या संघटनेच्या मार्फत तळा गावातील सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी कार्य केले. आगरी समाजाने आपल्या वडिलोपार्जित जमिनी जपून ठेवून आगरी समाजातील तरुणांनी गुन्हेगारी पासून दूर राहावे शिक्षणाचा मार्ग स्वीकारावा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करावा व संघटित व्हावे असे संघटनेमार्फत समाजहित कार्य केले. तसेच आगरी सेनेने ग्रामीण भागात शैक्षणिक साहित्य वाटप करून आगरी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी बळ दिले.
प्रत्येक वर्षी मोफत सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन आणि हजारो कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत केली तसेच आपल्या आगरी समाजातील होतकरू तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले.राजाराम साळवी यांनी लावलेल्या या आगरी सेनेच्या संघटनेच्या सामाजिक रोपट्याचे आज वीस लाखाहून अधिक सदस्य असून त्यांच्या या वृक्षाने आज ठाणे पालघर नवी मुंबई पनवेल तुर्भे वाशी वसई विरार भाईंदर सिंधुदुर्ग नाशिक या भागात विशाल वटवृक्षाचे रूप धारण केले आहे.



