महाराष्ट्र
व्यसनमुक्त समाज घडविण्याची शपथ तरुणांनी घ्यावी, हीच खरी शिवजयंती शिवरायांना आदरांजली – समाजभूषण डॉ लक्ष्मण आसबे

बावडा प्रतिनिधी -मोहंमद कैफ तांबोळी.मो.8378 076 123
छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडस व शौर्याचे पालन तरूणांनी आपल्या जिवनात करून व्यसनमुक्त समाज घडविण्याची शपथ घेतली तरच त्यांची जयंती साजरी केल्याचे मान्य होईल असे प्रतिपादन कामधेनू सेवा परीवाराचे अध्यक्ष व समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांनी केले.

टणू ( ता. इंदापूर ) येथील जय भवानी तरूण मंडळाच्या वतीने शिवजयंती सोहळ्यानिमित्त समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाळासाहेब मोहिते होते. तर शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक काटे, रोहीत जगदाळे, संतोष मोरे, सतीश काकडे, सागर इंगळे, सोनू पराडे पाटील, प्रा. रविराज काकडे, काका कोकाटे, डॉ बाळासाहेब आसबे, रणजीत वाघमोडे, मनोज जगदाळे, सरपंच प्रतिनिधी शितल मोहिते, संदिप मोहिते, राजेंद्र मोहिते, तेजस मोहिते आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. आसबे पुढे म्हणाले, टणू येथील मोहिते घराण्याची मालोजीराजे व त्यापुर्वी पासूनची नोंद इतिहासात आहे. मोहिते घराण्याचा थेट संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना सात भाऊ होते. त्यातील व्यंकूजी राजांची सून टणू येथील मोहिते घराण्यातील होती. उच्च कुळी, गौरवशाली घराण्याशी संबंध असलेले वारस माझ्या समोर आहेत ही बाब सार्थ अभिमानाची आहे. आपल्या गावाला गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौऱर्याच्या कथा अनेक आहेत.
शिवाजी महाराजांनी युद्धापेक्षा बुद्धीच्या बळावर स्वराज्य निर्माण केले. त्यांनी ३५० किल्ले जिंकले होते. ज्यांना आपल्या जिवनाला योग्य व चांगली कलाटणी मिळवायची असेल त्यांनी एकदा रायगड किल्ल्यावर यावे. आज जे काय मी करतोय त्याची प्रेरणा मला रायगड किल्ल्यावर गेल्यामुळेच मिळाली आहे. आज मितीला मी चार हजार विधवा भगिनी, साडेतीन हजार त्यांच्या मुलांचे शिक्षण व पालन पोषण करत आहे. विधवा होण्याचे दु:ख काय असते ते मी जवळून पाहतो व अनुभवतो आहे, असे शेवटी डॉ लक्ष्मण आसबे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कोकाटे यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र मोहिते यांनी, स्वागत विक्रांत मोहिते यांनी तर आभार सुनिल मोहिते यांनी मानले.




