महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत पणा हरवत चाललाय का…?

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499
01 मे 1960 साली स्थापन झालेल्या आपल्या महाराष्ट्राला आज जवळ जवळ 65 वर्षे पूर्ण झाली,अनेक हुतात्म्यांच्या बलिदानाने हा महाराष्ट्र स्थापन झाला आणि त्या नंतर महाराष्ट्राचा पुढील काळ सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय तसेच सहकारातून घडला…
हा महाराष्ट्र घडवण्यासाठी यशवंतराव चव्हाण ते राजाराम (बापू) पाटील,वसंतदादा पाटील,शंकरराव मोहिते पाटील,बाळासाहेब ठाकरे,गोपीनाथ मुंडे,विलासराव देशमुख यांच्या सह अनेक राजकारण्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तेंव्हा कुठे हा महाराष्ट्र घडला आणि सबंध भारतात गरजू लागला…
आपल्या या महाराष्ट्राला राजकारणाची एक सुंदर अशी किनार होती,महाराष्ट्रातील सुसभ्य राजकारणी याचे तंतोतंत पालन करत होते आणि महाराष्ट्राचा सुसंस्कृत पणा जोपासत हि होते,महाराष्ट्राच्या राजकारणातील असे अनेक प्रसंग आहेत की,एखाद्या प्रसंगावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र बसून काहीं प्रश्न मार्गी लावण्याचे काम या सर्वांनी केले…
परंतु आधुनिक महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्राचा हाच सुसंस्कृत पणा हरवलेला पहायला मिळत आहे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये तर हाच सुसंस्कृत पणा कधीच पहायला मिळाला नाही हि गोष्ट मात्र तितकीच खरी,या मागचे कारण अद्यापही समजलेले नाही परंतु एवढे मात्र निश्चित आहे की,राजकारण हे आता येथील राजकारण्यांच्या डोक्यात गेले आहे…
मला वैयक्तिक कुणावर टिका टिपण्णी करायची नाही आणि ते काम माझे नाही,या वेळी फक्त एवढेच सांगणे आहे की,राजकारणा मध्ये काम करत असताना भर रस्त्यावर उभे राहून एखाद्याचे माय बाप काढायचा अधिकार तुम्हांला नाहीय,तुम्हीं जनतेच्या मनातील प्रश्नांची उकल करण्यासाठी म्हणून नेमले गेले आहात याचे भान मात्र जरूर ठेवावे…
महायुतीच्या नेत्या मध्ये सध्याच्या घडीला “सफेदीची चमकार” जरा जास्तच झालेली पहायला मिळत आहे,असे वाटत आहे की,या नेत्यांना स्वतःचे काही “व्हिजन” आहे की नाही…? “कठपुतली” असल्या सारखे दुसऱ्यांच्या बोटावर नाचण्याचे काम काहीं नेते मंडळी इमाने इतबारे करत आहेत आणि सबंध महाराष्ट्रात रोज एक शेतकरी तरी आत्महत्या करत आहेत या विषयावर तर हे नेते मंडळी एक चकार शब्द हि काढायला तयार नाहीत…
बेताल वक्तव्य आणि सध्याचे महाराष्ट्र सरकार असे समीकरण जुळून येत आहे,सरकार मधील काहीं वाचाळवीरांना “लोकनेते” या शब्दाचा अर्थ अजून कळलाय की नाही असा प्रश्न मात्र निर्माण होत आहे,महाराष्ट्राची घडी विस्कटतेय…जनतेसाठी असणारे सरकार नेत्यांच्या वैयक्तिक राजकारणाचे “दुकान” होत चालले आहे हि बाबच महाराष्ट्रासाठी पुढील काळात “घातक” ठरणार आहे असे वाटत आहे…
चित्रा वाघ,किरीट सोमय्या,राणे बंधू,गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांनी आपल्या आवाजाने महाराष्ट्र गाजवलाय की गंजवलाय हेच कळायला मार्ग नाही,एकंदरित पणे जर पहायला गेल तर “पुरोगामी” विचाराचा महाराष्ट्र आज जातीय वादाने आणि वैयक्तिक स्तरावर सुरू असलेल्या राजकारणाने ग्रासून गेला आहे…
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील साहेब यांच्या वर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टिका केल्या नंतर देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रमण ध्वनी द्वारे जो मेसेज दिला आणि नंतर गोपीचंद पडळकर यांचे कान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पद्धतीने टोचलेही असतील.परंतु या दरम्यान सोशल मीडियावर गोपीचंद पडळकर ज्या प्रकारे ट्रोल झाले ते मात्र या महाराष्ट्राच्या कायम आठवणीत राहील…
संघाच्या जडण घडणीत तयार झालेले गोपीचंद पडळकर यांनी अटलबिहारी वाजपेयी,प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे आणि देवेंद फडणवीस यांचे अनुकरण करणे आता महत्वाचे आहे,गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वर विधान मंडळ परिसरात जे कांड केले त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला अगोदरच “कलंक” लागला आहे येथून पुढे हि पडळकर यांनी काळजी घेऊन आणि महाराष्ट्राच्या परंपरेला शोभावी असे वक्तव्य करावे अन्यथा सबंध महाराष्ट्र गोपीचंद पडळकर यांना कदापि माफ करणार नाही हे मात्र तितकेच खरे…



