कुरआन आणि रमजान.रमजानुल मुबारक क्रमशः -९

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
पवित्र रमजान महिन्यातील महत्त्वाची घटना म्हणजे कुरआनशरीफ चे पृथ्वीतलावर झालेले अवतरण. अल्लाहतआला,जो समस्त ब्रह्मiड चा रब आहे.जो निसर्ग,पृथ्वी, वातावरण या सर्वांचा मालिक आहे.ज्याला रब्बुल आलमिन म्हटले जाते.तो सर्वांचा आहे. फक्त मुस्लिमांचा नाही. केवळ मुस्लिमांचा असता तर त्याला रब्बुल मुसलिमीन म्हटले गेले असते.परंतु कुरआनशरीफची जी पहिलीच आयत आहे. ज्याची सुरुवात सुरए- फातेहा मध्ये होते.त्यात म्हटले आहे ‘अल्हमदुलिल्लाही रब्बील आलमीन.म्हणजे तो ईश्वर,जो संपूर्ण सृष्टीचा(आलम ) रब आहे.
लोकांच्या मार्गदर्शनासाठी अल्लाहतआला ने कुरआन शरीफ हा ईश्वरी ग्रंथ आपला खास दूत फरिश्ता हजरत जीब्रईल मार्फत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यांनी तो आपल्या अनुयायांमार्फत लोकांमध्ये आम (सार्वजनिक) केला.अल्लाहने हा ग्रंथ फक्त मुस्लिमांसाठी नाही तर,या जगातील समस्त मानवजातीसाठी पाठविला आहे.म्हणून आज संपूर्ण जगभरामध्ये केवळ मुस्लिम नव्हे तर जगभरातील सर्व जाती, धर्म आणि पंथाचे लोक कुरआनशरीफ समजून घेत आहेत.जगातील सर्व भाषांमध्ये त्याचे भाषांतर झालेले आहे.जगातील अनेक विद्यापीठांमध्ये कुरआनशरीफ वर खास संशोधन आजही सुरू आहे. मराठी भाषेत देखील कुरआन उपलब्ध आहे.माझ्या अनेक मराठी मित्रांनी आत्तापर्यंत त्याचा लाभ घेतला आहे.ते कुरआन शरीफचे अध्ययन करतात आणि प्रश्नोत्तर रूपाने समजूनही घेतात. काही वर्षांपूर्वी अहमदनगरमध्ये झालेल्या ग्रंथप्रदर्शनात सर्वाधिक विक्री मराठी भाषेतील कुरआन शरीफ या ग्रंथाची झाली हे विशेष.
हा ईश्वरी ग्रंथ रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये पृथ्वीवर अवतरला.दरवर्षी रमजानमध्ये,जगामध्ये जसेजसे प्रसंग निर्माण होत,त्यानुसार अल्लाह कडून हजरत पैगंबरांना कुरआनच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळत असे. प्रेषित हजरत पैगंबरांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी नबुवत (प्रेषित्व )प्राप्त झाली. तद्नंतर लगेच कुरआनशरीफचे अवतरण सुरू झाले. जवळपास तेवीस वर्षांच्या कालावधीमध्ये हा ग्रंथ हजरत पैगंबरांपर्यंत आला.त्यांनी तो लोकांपर्यंत पोहोचवला.प्रत्येक माणसाने आपले जीवन कशा प्रकारे व्यतीत करावे याचे सखोल मार्गदर्शन कुरआनशरीफ मध्ये अल्लाहतआलाने केले आहे.प्रत्येकाने काय करावे,काय करू नये, पुण्य कशामध्ये आहे, पाप कशामुळे होते, मोठ्यांशी कसे वागावे, छोटयांशी कसे वर्तन करावे,व्यवहारात पारदर्शकता कशी असावी अशा अनेक बाबी,ज्या आपल्या जीवनाशी संबंधित आहेत.त्याचे मार्गदर्शन कुरआनशरीफ मध्ये केलेले आहे.आज आपण कुरआनची शिकवण सोडून दिल्यामुळे संपूर्ण जगच संकटात सापडले आहे.यासाठीच कुरआनशरीफ समजून घेऊन त्याचा अंगीकार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करण्याची आवश्यकता आहे.
(क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082.