अवकाळी पाऊस आणि वादळं यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत – माजी आमदार नारायण पाटील यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
अवकाळीचा पाऊस आणि वादळं यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई साठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात यावेत अशी मागणी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की काल व आज अचानक जेऊर, दहिगाव, वांगी नंबर दोन तसेच करमाळा तालुक्यात काही भागात वादळवाऱ्याने थैमान घातले तसेच अवकाळी पाऊस पडला. यामुळे या पट्ट्यात हजारो एकर केळी पिकांचे नूकसान झाले आहे.
वादळाचा वेग प्रचंड असल्याने बहुतांश ठिकाणी केळी पिक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. लाखो रुपये खर्च करुन हाताशी आलेले पिक शेतकऱ्यांच्या नजरेसमोर उध्वस्त झाल्याने आता शेतकऱ्यांना आर्थिक नूकसानीस सामोरे जावे लागणार आहे. एकीकडे उन्हाची प्रचंड तीव्रता असताना आणि उजनीची पाणी पातळी मायनस मध्ये गेली असताना मोठी कसरत करुन शेतकऱ्यांनी पिकांची जोपासना केली होती. उजनीच्या प्रत्यक्ष पाणीसाठ्या पर्यंत चारी घेऊन आणि वीजेचे अतिरिक्त पोल, केबल याचा खर्च या उभ्या पिकात निघून जाईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. पर्ंतू शेतकऱ्यांना आता या नैसर्गिक संकटाचा चांगलाच फटका बसला आहे.

तरी महसुल आणि कृषी विभागांनी तातडीने अशा नुकसान झालेल्या भागातील माहिती एकत्रीत करुन पिकांचे पंचनामे करावेत. तहसिलदार महोदयांच्या हाती सर्व अधिकार असल्याने निवेदने आणि मागण्यांची अधिक वाट न पाहता करमाळा तालुक्यातील वादळं आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांची माहिती संकलीत केली जावी आणि पुढील कार्यवाही होऊन शेतकऱ्यांना किमान एकरी एक लाख रुपयांची तरी नूकसान भरपाई मिळेल असे सकारात्मक आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन नुकसान भरपाई अहवाल तयार करण्यासाठी मंडल अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, सेवक आदिंना आदेश दिले जावेत अशी मागणी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
तसेच पाटील गटाच्या कार्यालयातुनही महसुल व कृषी मंडलानुसार अवकाळी पाऊस आणि वादळं यात झालेल्या नुकसानीची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु असुन माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील पाऊल उचलले जाणार असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.



