पोलीस व जनता एकत्र राहिल्यास कायद्याचे राज्य कायम राहील..अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांचे प्रतिपादन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत.
समाज माध्यमांवरील एखादी पोस्ट दंगलीला कारणीभूत ठरत असताना समाजातील दुरावा व शांतता बिघडू नये यासाठी समाजाला जागृत करण्याचे काम महत्त्वाचे आहे. समाजाला माहिती देण्याचे काम पोलीस करत असून पोलीस व जनतेचे संबंध महत्त्वपूर्ण आहेत. परस्परांमधील असे संबंध कायम राहिले तर कायद्याचे राज्य कायम राहील असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी बुधवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी पालघर येथे केले.

पालघर जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशन यांना आयएसओ मानांकन तसेच स्मार्ट पोलीसिंग प्रमाणीकरण झाल्याने त्यानिमित्ताने बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित कार्यक्रमाला प्रवीण साळुंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

गडचिंचले हत्याकांडाच्या तपासाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यात आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचा दौरा केला यादरम्यान विविध पोलीस स्टेशनची असलेली दुरावस्था आपण पाहिली होती. गेल्या अडीच- तीन वर्षात जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचा झालेला कायापालट व स्मार्ट पोलीसिंगचे प्रमाणीकरण ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्यस्थितीत पोलीस कोणतीही जबाबदारी झटकू शकत नाहीत असे सांगत पालघर पोलीस दलाने प्रत्येक गावात नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गावातील समस्या जाणून त्या शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी पाठपुरावा करावा असा सल्ला देखील त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिला.

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जनसंवाद अभियानांतर्गत पालघर जिल्हात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या अभियानामुळे जिल्ह्यात टळलेल्या काही अप्रिय प्रसंगांची माहिती दिली. जिल्ह्यातील तरुणांसाठी नोकर भरती, पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण, बालविवाह रोखण्यासाठी केलेली जनजागृती, महिला सक्षमीकरण, नशा मुक्ती, रस्ता सुरक्षा अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, सायबर जनजागृती, सागरी सुरक्षा संदर्भातील व इतर उपक्रमांची माहिती दिली.



