वीर धरणामधून निरा उजवा कालव्याला पाणी सोडण्यात यावे ; आ.रणजीतसिंह मोहिते-पाटील

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.– 97 30 867 448
महाराष्ट्रात मान्सून सुरू झाला तरी अद्याप सोलापूर जिल्ह्यातील निरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाचे आगमन लांबणीवर गेले आहे. शेतकरी हवालदिल झाले असून पेरणी वेळेवर होण्याकरिता बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. ऊस लागवडी करीता जमिनीची मशागत करून ठेवलेली परंतु पाण्या अभावी ऊस पिकांची लागवड झालेली नाही .शेतकऱ्यांची इतर उभी पिके धोक्यात आलेली आहेत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा व पिकांना पाणी देण्यासाठी वीर धरणामधून पंढरपूर माळशिरस सांगोला ,फलटण तालुक्यासाठी पाणी सोडण्यात यावे अशी सुचना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता गुणाळे यांच्याकडे केली.
मागील काही वर्षापासून शेतकरी कोरोनामुळे तसेच शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच अद्यापपर्यंत मान्सूनचा समाधानकारक पाऊस पडला नसल्याकारणाने बळीराजाला पुन्हा आर्थिक संकटांची चिंता जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या फळबागा पिके पाण्याअभावी जळू लागल्या आहेत.
शेतकऱ्यांनी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे वीर धरणामधून निरा उजवा कालव्याला आवर्तन सोडण्यात यावे म्हणून मागणी केली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तात्काळ जलसंपदा विभागचे मुख्य अभियंता गुणाळे यांना सुचना केली असता येत्या दोन ते तीन दिवसांत धरणामधून पाणी सोडण्यात येईल असे सांगितले.



