महाराष्ट्र

शालेय अभ्यासक्रमात संस्कार विषय सक्तीचा करावा- दिपकराव खराडे-पाटील

अकलूज प्रतिनिधी शकुर तांबोळी

‘वसा घेतला समाजसुधारणेचा
ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा
प्रतिकार केला दृष्ट जाती भेदाचा
अभिमान वाटतो महान आमच्या राजाचा’

सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज स्मृतीदिन शताब्धी वर्षपूर्ती, वार्षिक निकाल वितरण व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार समारंभ साजरे करण्यात आले. याप्रसंगी स. म. शंकरराव मोहिते-पाटील सूत गिरणी, अकलूज चे संचालक दिपकराव खराडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम साजरे करण्यात आले.

सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी केले. यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्धी निमित्त शासनाच्या वतीने राबविलेल्या उपक्रमांची माहिती देऊन छत्रपतींच्या जीवन कार्याची ओळख करून दिली तसेच विद्यालयातील माध्यमिक,उच्च माध्यमिक, व्यवसाय अभ्यासक्रम, द्विलक्षी अभ्यासक्रम या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या व एन.एम.एम.एस परीक्षेत जिल्ह्यात प्रविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना तसेच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शाहू महाराजांच्या स्मृती दिन प्रित्यर्थ त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तदनंतर विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, सेवानिवृत्त सेवकांचा व संस्थांतर्गत बदली झालेल्या शिक्षक-शिक्षकेत्तरांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिपकराव खराडे-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

विद्यार्थी मनोगतामध्ये इयत्ता ७ वी मधील विद्यार्थिनी कु.संस्कृती कोरेकर हिने छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय खास आपल्या वक्तृत्व शैलीत करून दिला.यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिपकराव खराडे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात बहुजन समाजात शिक्षणाची ज्ञानगंगा प्रसार करण्यात मौलाचे कार्य करणारे तसेच स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, अस्पृश्यता निवारण कार्यात स्वतःला वाहून घेणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा तसेच मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विविध प्रसार माध्यमाच्या मोहात न अडकता भरपूर अभ्यास, व्यायाम करावा, नैतिकतेची मूल्ये जोपासावीत. आधुनिक काळात जग मोबाईलने जवळ आले पण माणसे दुरावली यासाठी मोबाईलच्या या युगात मुलांना संस्कारश्रम मूल्यांची गरज असल्याने शासनाने शालेय अभ्यासक्रमात संस्कार हा विषय सक्तीचा करावा. असे बहूमोल विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमास माजी उपप्राचार्य संजय राऊत, दादा मदने, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, राजश्री करंडे, पर्यवेक्षक उमेश बोरावके, राजन चिंचकर, प्रमिला राऊत शिक्षक प्रतिनिधी सुखदेव भोसले, शिक्षक-शिक्षकेत्तर, बहुसंख्य पालक, विद्यार्थी उपस्थित होते. निकाल वाचन राजेंद्र धोत्रे, असिफ झारेकरी यांनी केले. सतीश काटकर, दादा साठे, जीवन कस्तुरे, दादा नवगिरे यांनी बक्षीस वितरणाचे कामकाज केले. आभार उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे यांनी मानले. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या सूचना देण्यात आल्या . सुट्टीतील छंद, दक्षता व शुभेच्छा देण्यात आल्या. निकालाचे वाटप होऊन कार्यक्रमांची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button