शहर

८७ महिण्याचा थकीत पगार न मिळाल्याने श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा दिव्यांग कर्मचारी मागतोय करमाळ्यातील गल्ली बोळांतून भीक…

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60:-

डोक्यावर मुंडासे, वाढलेली दाढी, अंगात फाटका शर्ट, गळ्यात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडून असलेल्या अपेक्षांची पाटी अडकवून मागील दोन दिवसांपासून करमाळा परिसरात एक दिव्यांग व्यक्ती गल्ली बोळांतून एक पाय फरफटत भिकेची याचना करत फिरत आहे. गळ्यात असलेल्या पाटीवरील मजकूर वाचण्याचा प्रयत्न केला असता त्या पाटीवर या दिव्यांग व्यक्तीवर कशाप्रकारे अन्याय झाला आहे, याची कारणे लिहिलेली दिसत आहेत.

यातील बहुतेक कारणे सर्वसामान्यांना पटण्यासारखी असून सामाजिक भान ठेवत काहीजण या व्यक्तीला आर्थिक हातभार लावण्याच्या विचाराने मदत म्हणून भीक देत आहेत.या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता तिने आपली कर्मकहाणी उलघडली आहे. या व्यक्तीचे नाव महादेव मच्छिंद्र मस्के असे आहे. उतारवयाकडे झुकलेल्या मस्के यांच्या म्हणण्या नुसार आदिनाथ स.सा. कारखान्याकडे फेब्रुवारी २०२३ अखेर एकूण ८७ पगार थकीत आहेत. मस्के यांच्यासह इतर चार कामगारांवर औद्योगिक न्यायालयात असलेल्या केसचा १९/०८/२०२० रोजी निकाल लागून मस्के यांना कामावर घेण्याचा आदेश झाला असताना कारखाना प्रशासनाने २०२३ मध्ये कारखाना चालू होऊनही कामावर घेतले नाही. तसेच थकीत पगार दिला नाही. त्यामुळे ते व त्यांचे कुटुंबीय उपासमारीचे जीवन जगात असून त्यांच्या मुलाबाळांवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासन दरबारी ‘ भिकारी’ म्हणून नोंद होण्याची मागणी मस्के यांनी केली असून डाक बंगला , कोर्ट परिसर, य. च. महाविद्यालय, पोथरे नाका, करमाळा बसस्थानक सह शहरातील गल्ली बोळांतून ते भीक मागत फिरत आहेत.

याबाबत त्यांनी तहसीलदार करमाळा यांना दि. ५ मार्च रोजी ई-मेल द्वारे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, एम.एस.सी. बँकेकडून साखर विक्रीतून कामगार म्हणून मस्के यांना जे पैसे मिळणार होते, कारखाना प्रशासनाने जाणीवपूर्वक कामगार हजेरी पत्रक, पगार पत्रक मागील पाच वर्षापासून कामगार आयुक्त यांच्याकडे न देता ते अजूनही थकीत ठेवलेले आहेत. त्यामुळे अंगावर पोस्टर लावून ते करमाळा तालुका व शहरात भिक मागत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास कारखाना प्रशासन व पगार थकवणाऱ्या पदाधिकार्यांना जबाबदार धरण्यात यावे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे कि, मला उच्च शिक्षण घेता आले नाही म्हणून मला माझ्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचे आहे, म्हणून मी भिक मागत असून मुलगा व मुलीच्या उच्च शिक्षणासाठी दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार यांनी मदत करावी. तसेच आदिनाथ कारखाना प्रशासन व पदाधिकारी यांच्यापासून मला व माझ्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्याने शासनाने योग्य ती कारवाई करून माझे व कुटुंबियांचे रक्षण करावे. मस्के यांनी या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर, उपविभागीय पोलिस अधिकारी करमाळा व पोलिस निरीक्षक करमाळा यांनाही पाठवल्याचे नमूद केले आहे.

मस्के यांनी गळ्यात अडकवलेल्या पोस्टरवर बागल गटाने राजकीय आकस धरून कामावर न घेतल्याचा उल्लेख केला आहे. तसेच स्वतसाठी, कुटुंबासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी ९९२१३३७९४१ या नंबरवर फोन करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button