पत्रकार समाजाचा आरसा; त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठीच सन्मान सोहळ्याचे आयोजन – गणेश इंगळे

संगम येथे माळशिरस आणि माढा तालुक्यातील पत्रकारांचा स्नेहभोजन व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
संगम : “शिवसेना आणि पत्रकार यांचे नाते शिवसेनेच्या जन्मापासूनचे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः ‘दैनिक सामना’च्या माध्यमातून लेखणीच्या जोरावर समाजजागृती केली. आजही सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना पत्रकारांची मोठी साथ आम्हाला मिळते. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे,” असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी केले.
माळशिरस तालुक्यातील संगम येथे गणेश इंगळे यांच्या वतीने माढा आणि माळशिरस तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी ‘स्नेहभोजन व गौरव सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

पत्रकार-शिवसैनिक स्नेहाचा संगम
कार्यक्रमात बोलताना गणेश इंगळे पुढे म्हणाले की, “शिवसैनिक आणि आंदोलने हे एक समीकरण आहे. तालुक्यातील जनतेच्या हितासाठी आम्ही जेव्हा जेव्हा आवाज उठवतो, तेव्हा पत्रकार बांधव त्याला प्रसिद्धी देऊन न्याय मिळवून देण्याचे काम करतात. सन्मान करणे ही मोठी बाब नाही, परंतु त्या निमित्ताने सर्व पत्रकारांचा सहवास लाभतो आणि त्यांचा गौरव करण्याची संधी मिळते, हे मी माझे भाग्य समजतो.”
या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार, सोपान ढगे, भारत तात्या मगर, विष्णू तात्या बिचकुले (संपादक, गावकुस), गणेश जाधव, हरिश्चंद्र गाडेकर, श्रीनिवास कदम पाटील, संतोष भोसले, राजू लोहकरे, सुखदेव साठे, निनाद पाटील, राजेंद्र मिसाळ, विलासनंद गायकवाड, लक्ष्मीकांत कुरुडकर, सागर खरात, अमित गदादे, नितीन मगर, श्रीमंत बनकर, नौशाद मुलाणी, ॲड. गोपाळ लावंड, गणेश करडे, सोमनाथ खंडागळे, देवानंद साळवे, शाहरुख मुलाणी, योगेश शेंडगे यांच्यासह दोन्ही तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व पत्रकार बांधवांना स्नेहभोजन देण्यात आले. त्यानंतर गणेश इंगळे यांच्या हस्ते सर्व पत्रकारांचा भगवा फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पमाला व गुलाब पुष्प देऊन यथोचित गौरव करण्यात आला. समाजाचा आरसा म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याची दखल घेणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी माळशिरस तालुका उपप्रमुख दत्ता साळुंके यांच्यासह शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले.



