अकलूज आरटीओ कार्यालयाचा गलथान कारभार,नागरिकांची लूट,एजंट लोकांचा सुळसुळाट…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
साधारणपणे 2004 साली MH 45 या नावाने सुरू झालेल्या आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा,माळशिरस व सांगोला तालुक्यातील वाहनांचे आर टी ओ क्षेत्र असलेल्या अकलूज आर टी ओ कार्यालय येथे पूर्ण कारभार ढेपाळला असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले पहायला मिळत आहेत…
अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालयाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला असून,येथील गलथानपणामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहन परवाना (Driving License),फिटनेस प्रमाणपत्र,वाहनांची नोंदणी (Registration) आणि इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कोणताही सहयोग मिळत नसल्याचे नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहे…
येथील एजंट लोकांचा मोठा विळखा,विशेष म्हणजे,कार्यालयात एजंट लोकांनी पूर्णपणे कब्जा केला आहे.कोणत्याही कायदेशीर कामासाठीही नागरिकांना एजंट शिवाय प्रवेश मिळत नाही आणि एजंट शिवाय कुठले सुद्धा काम होत नाही,अशी परिस्थिती आहे.साध्या कामासाठीही एजंट मार्फत ‘चढ्या दराने’ पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिक उघडपणे करत आहेत.एजंट आणि अधिकारी-कर्मचारी यांच्या संगनमताने हा गैरकारभार सुरू असल्याचा आरोप सुद्धा होताना दिसत आहे…
कामकाजात विलंब आणि मनमानी :-
वेळेवर कामे होत नाहीत – कागदपत्रे पूर्ण असूनही,अधिकाऱ्यांकडून विनाकारण विलंब लावला जातो.’आज नाही उद्या या’ असे सांगून नागरिकांना हेलपाटे मारायला लावले जातात…
परवान्यासाठी लाचखोरी :- नवीन वाहन परवाना किंवा नूतनीकरणासाठी नियमबाह्य पद्धतीने पैशांची मागणी केली जात असल्याचे बोलले जात आहे.पैसे न दिल्यास नागरिकांचे अर्ज फेटाळले जात आहेत किंवा अडवून ठेवले जात आहेत…
वाहनांच्या तपासणीत दिरंगाई :- वाहनांच्या फिटनेस आणि पासिंगच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या चर्चा सुद्धा आहेत…
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मात्र या कडे दुर्लक्ष..? या सर्व गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे का…? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.या कार्यालयातील अनियमितता आणि भ्रष्ट कारभारामुळे शासनाचा महसूल बुडत आहेच,शिवाय सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक सुद्धा होत आहे…
अकलूज आरटीओ कार्यालयाच्या या गलथान कारभाराची तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच एजंटशाहीचा हा विळखा मोडून काढण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे,अशी मागणी येथील वाहनधारक आणि नागरिकांनी टाइम्स 9 च्या माध्यमातून केली आहे.



