महाराष्ट्र

अजितदादांच्या राष्ट्रवादीचा ‘एकला चलो’चा नारा? स्थानिक निवडणुकांबाबत प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

राज्यसभा आणि लोकसभा निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी उमेदवारी, जागा वाटपाचे निर्णय जिल्हास्तरावर घेण्यात येतील. यातून कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करता येईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार पटेल म्हणाले, राज्यात हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला ओबीसींमध्ये सामावून घेण्याकरिता काढण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या विरोधात ओबीसी समाज आंदोलन करीत आहे. मात्र त्यांच्या हक्कावर कुठलाच आघात होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे.

हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय हा सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन करण्यात आला होता. सरसकट देण्याचा प्रश्नच येत नाही. छगन भुजबळ हे आधीपासूनच ओबीसींच्या हक्कासाठी लढा देत आहेत. मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसींना संविधानिक अधिकार मिळाले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

विरोधकांची टीका राजकारणाचा भाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला आहे. केंद्र सरकारकडे अहवाल सादर करून मदतीची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार-खासदारांनी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे. विरोधकांची टीका ही राजकारणाचा भाग आहे. शिवसेना (उबाठा) चे खासदार संजय राऊत यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोलाही खासदार पटेल यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button