महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले
अरुण गांधी यांचे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात वास्तव्य होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांचे पुत्र तुषार गांधी कोल्हापुरला येण्यास निघाले आहेत,
अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. १४ एप्रिल १९३४ रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते त्यांचे आजोबा महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक कार्यात सक्रिय होते. अरुण गांधी यांनीही काही पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी ‘द गिफ्ट ऑफ एंगर : अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी’ हे त्यांचे प्रमुख पुस्तक आहे. अरुण गांधी १९८७ मध्ये त्यांच्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी Christian Brothers विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली.



