भोर तालुक्यात स्मशानभूमी होणार जंगलमय ;
ध्रुव प्रतिष्ठानची आगळीवेगळी संकल्पना

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल
भोर तालुक्यात ध्रुव प्रतिष्ठानने सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. भविष्यकाळात दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जतन होण्यासाठी ध्रुव प्रतिष्ठानकडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना एक देशी वृक्ष, ट्री गार्ड दिले जाणार असून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार ठिकाणच्यालगत रक्षाकुंभात रक्षा जावी या हेतूने मोकळ्या टाकीचे बांधकाम केले जाणार आहे. यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होणार असून पाणी दूषित होणार नाही. तालुक्यात ही मोफत योजना ध्रुव प्रतिष्ठानकडून राबवली जाणार आहे
ही योजना यशस्वी होण्यासाठी भोर तालुक्यात पाच ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून घेतला आहे. या ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर रक्षाकुंभात रक्षा पडावी या हेतूने ध्रुव प्रतिष्ठान मार्फत चार बाय चार या आकाराच्या टाकीचे बांधकाम केले जाणार आहे. तसेच मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना एक देशी वृक्ष दिले जाणार आहे. स्मशानभूमीत मोकळ्या जागेत खड्डा खांदून या खड्ड्यात मृत व्यक्तीशी रक्षा टाकली जाणार असून संस्थेकडून मिळालेल्या देशी वृक्षाची लागवड केली जाणार आहे. तसेच या वृक्षाचे संवर्धन व्हावे यासाठी ट्री गार्ड मोफत दिले जाणार आहे. या ट्रीगार्ड वर दिवंगत व्यक्तीचे नाव, मृत्यूचा दिनांक, वार व माहिती फलक संस्थेमार्फत बसवले जाणार आहे. वृक्ष मोठे होईपर्यंत वृक्षाचे संवर्धन दिवंगत व्यक्तीच्या नातेवाईकांनी करायचे असल्याची माहिती ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी माहिती दिली.
स्मशानभूमीत या देशी वृक्षाची लागवड दिवंगत व्यक्तीच्या नातेवाईकांनी दशक्रिया विधीच्या दिवशी करायची आहे. काही कालावधीनंतर या संकल्पनेमुळे स्मशानभूमी जंगलमय होणार असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल तसेच मृत व्यक्तीच्या रक्षा पाण्यात न टाकल्याने पाणी दूषित होणार नाही. भविष्यात ही गावे पुरातन व्यक्तींची स्मृती जपणारे गाव म्हणून ओळखली जाणार आहेत.



