पालघर पोलिसांचा धडाकेबाज कारनामाघरफोडी प्रकरणातील ५ आरोपी नेपाळ सीमेजवळ अटक; ₹३.२८ कोटींचा ऐवज परत

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर शहरातील नाकोडा ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात झालेल्या घरफोडीत तब्बल ₹३.७२ कोटींचा ऐवज लंपास झाल्यानंतर केवळ ४८ तासांत पालघर पोलिसांनी गुन्ह्याचा पर्दाफाश केला. गुजरातमार्गे नेपाळकडे पळ काढणाऱ्या आरोपींचा माग काढत भारत–नेपाळ सीमेवरून चार आरोपी, तर सुरत येथून आणखी एक आरोपी अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ₹३,२८,१८,४५० किंमतीचे सोने, चांदी व रोख रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
फिर्यादी पियुष जैन, रा. पालघर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे नाकोडा ज्वेलर्स दुकान ८ नोव्हेंबर रोजी रात्री बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारील दुकानाचे शटर तुटलेले दिसून आल्यानंतर तपास केला असता, सामाईक भिंतीत होल पाडून चोरट्यांनी आत प्रवेश करून, गॅस कटरने तिजोरी कापून ५.४२ किलो सोने, ४० किलो चांदी व ₹२० लाख रोख असा मोठा ऐवज चोरून नेल्याचे उघड झाले. सीसीटीव्ही फुटेजमधून मॉलचे वॉचमन दिपक सिंग व नरेश हे गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले.
प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय अधिकारी प्रभा राऊळ यांनी घटनास्थळी भेट देत स्वतंत्र पथके तयार करण्याचे आदेश दिले. तांत्रिक तपासातून आरोपी हे नेपाळचे नागरिक असल्याचे समोर आले. त्यांनी गुजरातमार्गे नेपाळकडे पलायन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथके गुजरात व उत्तर प्रदेशमधील खेरी येथे नेपाळ सीमेजवळ रवाना केली. तेथील सुरक्षा यंत्रणेच्या मदतीने आरोपी दिपक नरबहादुर सिंग, भुचनसिंग चेलाऊने, जिवनकुमार थारु, खेमराज देवकोटा यांना सीमा तपासणीदरम्यान अटक करण्यात आली, तसेच सुरत येथून अर्जुन दामबहादुर सोनी यास ताब्यात घेण्यात आले. असे ऐकून पाच आरोपींना अटक करण्यात आले आहे.
अटक आरोपींकडून २,२५५.६८ ग्रॅम सोने, ४१ किलो ४८१ ग्रॅम चांदी व ₹४,९४,६५० रोख रक्कम असा एकूण ₹३.२८ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तपास सपोनि मल्हार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखा, पालघर पोलीस ठाणे व सायबर शाखेच्या पथकांनी ही कारवाई संयुक्तरीत्या केली.
पालघर पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.



