नीरा नदीत पाणी नसल्याने पादुकांना टँकरने स्नान घालण्याची प्रशासनावर यावर्षी वेळ

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123
जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम २३ जून रोजी सराटी (ता. इंदापूर) येथे आहे. येथे महाराजांच्या पादुकांना परंपरेप्रमाणे नीरा नदीत स्नान घालण्यात येते, मात्र, पावसाची दोन नक्षत्र मोकळीच गेल्याने नीरा नदीत पाणी नसल्याने पादुकांना टँकरने स्नान घालण्याची वेळ प्रशासनावर येते की काय अशी परस्थिती निर्माण झाली आहे.
जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी येथे असतो. सोहळ्यातील वैष्णवांच्या अंघोळीची सोय व्हावी. तसेच, महाराजांच्या पादुकांना परंपरेप्रमाणे नीरा नदीच्या पाण्याने स्नान घालता येईल, यादृष्टीने मुक्काम केला जातो. मात्र, मागील अनेक वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे नीरा नदी सतत कोरडी पडत आहे, त्यामुळे पादुकांचे नीरास्नान सलगपणे टँकरच्या पाण्याने केले जात आहे. यावर्षीही नीरा नदी अद्यापी कोरडीच दिसत आहे. प्रशासन पादुका स्नानासाठी वरील बंधाऱ्यातून पाणी सोडून पाणी उपलब्ध करून देणार का? यावर उपाय योजना आखण्याचा मानस पालखी काळात प्रशासनाकडून केला जातो; परंतु पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर पुढील वर्षीच पादुका स्नानावेळीच यासंदर्भात सर्वांना जाग येते.

दरम्यान अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह निंबाळकर मागील वर्षी पालखीतळाची तसेच पालखी तयारीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पादुका स्नानासाठी घाट बांधण्याच्या सुचना प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार सध्याला घाट बांधण्याचे व घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काॅक्रिटीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे सरपंच अनिसा तांबोळी यांनी सांगितले. तसेच पालखी स्वागताचीही जय्यत तयारी सुरू आहे.



