कंत्राटदार जोमात, शेतकरी कोमात”, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मुंबई : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदार जोमात आणि शेतकरी कोमात असा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे म्हणाले, “महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे यांचे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा आहे. कारण अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका या संपावर आहेत. सरकार त्यांच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. शासकीय रुग्णालयात डॉक्टर, औषधे आणि उपचाराविना आहेत. यामुळे गेल्या वर्षभरात मृत्यू झाले त्याकडे लक्ष दिले गेले नाही. पण नवीन शासकीय विद्यालय आणि रुग्णालय, नवीन रस्त्यांच्या घोषणा करत आहे. पण पहिल्या योजनांचा पाठपुरवठा कुठेच दिसत नाही. नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाच्या पाठला करायला लावायचे, असे सरकारचे धोरण आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. जरांगेंची चिवटपणे चौकशी करा मनोज जरांगेंना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची स्क्रिप्ट दिल्याचा आरोप सत्ताधारी करत आहे? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, आज मनोज जरांगे यांनी जे आंदोलन सुरु केले आहे त्याची एसआयटी चौकशी करण्याचाही ठराव झाला. पण मनोज जरांगेंची एसआयटी चौकशी सरकारने चिवटपणे करावी आणि त्यात कोण कोण आहेत? कुणाला कुणाचे फोन जात होते ते तपासले पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज्य सरकारसह लगावला. शिवस्मारकाचे काय झाले? मराठी भाषासंदर्भात उल्लेख केला नाही? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “मराठी भाषेचा उल्लेख केला गेला नाही. शिवरायांच्या गडकिल्ल्याबाबत आम्ही जे धोरण घेतले होते. त्याचा सरकारने पुनरुच्चार केला. मात्र वाजत-गाजत पंतप्रधान मोदींच्या हस्ते जे शिवस्मारकाचे जलपूजन झाले होते. ते कधी पूर्ण होणार यांची गॅरंट कोणच घेत नाही म्हणजे पुढचे पाठ मागचे सपाट असे अर्थसंकल्प आहे की काय? असा सवालही उद्धव ठाकरेंनी सरकारला केला आहे.



