महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांनी केलेली “ती” चूक अजित पवार करणार नाहीत? ४० आमदारांचा गट कसा बाहेर पडणार?

ऑपरेशन लोटस बाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तांतराच्या चर्चा सुरु आहेत. या बदलात जे सहभागी आहेत, त्यांनी आतापर्यंत स्पष्ट वक्तव्य केलेलं नसलं तरीही राज्यभरात स्थानिक पातळीपासून मुंबईपर्यंत प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच अजित पवार पक्षातून बाहेर पडणार असल्याचे संकेत आहेत. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांचा गट घेऊन ज्या पद्धतीने बंडखोरी केली, ती चूक आता अजित पवार करणार नाहीत, अशी चर्चा आहे. त्यांनी ती चूक टाळली तरच पुन्हा सत्तापेच उद्भवणार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपात विलीन झाला नाही ना त्यांनी शिवसेना सोडली.. आता अजित पवार नेमकं काय करू शकतात, यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं भाष्य केलंय.

एकनाथ शिंदेंनी काय चूक केली?

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांचा गट घेऊन शिवसेना सोडली नाही. तर पक्षनेतृत्व मान्य नसल्याचं पत्र राज्यपालांना दिलं होतं. एवढ्या मोठ्या संख्येने आमदार बाहेर पडत असतील तर त्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन होणं आवश्यक असतं. अन्यथा पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन होतं. सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात याच मुद्द्यावरून खटला सुरु आहे. कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी लागू शकतो, यात शिदेंसह १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

अजित पवार चूक कशी टाळणार?

आता अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासारखी चूक करणार नाहीत, म्हणजे नेमकं काय करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते एवढ्या सहजा सहजी सोडतील, असं वाटत नाही. तर भाजपात विलीन होण्यासारखी नामुष्कीदेखील ओढवून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे तिसरा मार्ग काढला जाऊ शकतो. याला ऑपरेशन लोटस असे म्हणता येईल. पृथ्वीराज चव्हाण यांनी याबद्दल सविस्तर सांगितलं.

ऑपरेशन लोटस काय आहे?

अजित पवार हे लवकरच बंडखोरी करणार, अशी बातमी पाहिली. ही बातमी गृहित धरली तर काय घडू शकतं, यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले, ‘ ही मंडळी भाजपमध्ये जायला तयार आहेत का ते पहावं लागेल. ते भाजपमध्ये मर्ज होणार का आणखी काही मार्ग काढणार आहेत हेही महत्त्वाचं आहे. जोपर्यंत दुसऱ्या पक्षात फुटीर गट विलीन होत नाही, तोपर्यंत पक्षांतर्गत बंदी कायदा लागू होतो. त्यामुळे इथे ऑपरेशन लोटसची शक्यता आहे. म्हणजे काही आमदारांनी राजीनामा द्यायचा. याचं कुणाला बंधन नसतं. असं झाल्यास सभागृहाची संख्या 288 वरून कमी होते. परिणामी मध्यबिंदू अर्थात मॅजिक फिगर खाली जातो. राजकीय समीकरणं बदलू शकतात. जे राजीनामा देऊन बाहेर पडतील. सामान्य नागरिक होतात. त्यांना मंत्री होता येतं. असे प्रयोग कर्नाटकात वगैरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस घडू शकतं, अशी शक्यता पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button