रझाकाराविद्ध लिहिल्याने शहीद झालेले पत्रकार शोएब उल्लाह खान किती जणांना माहित आहेत?

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
‘इमरोज’ या उर्दू वृत्तपत्रातून या वृत्तपत्राचा तरुण संपादक *) “शोएब उल्लाह खान ” हा रझाकाराविरुद्ध लिहित असे. रझाकाराविरुद्ध लढून भारतात सामील होणे आपल्या हिताचे आहे, असे पटवून देत असे. त्याला अनेकवेळा रझाकारांच्या धमक्या आल्या पण या धमक्यांना न जुमानता शोएब उल्लाह खान आपली मतं ‘इमरोज’द्वारे मांडू लागला. दि.२० ऑगस्ट १९४८ रोजी शोएब उल्ला खान यांना धमकीचे पत्र आले. दि.२१ ऑगस्ट १९४८ च्या रात्री रझाकारांच्या गुंडांनी शोएब उल्लाह खान यांचे हातपाय कलम करुन त्यांची हत्या केली.
यामागची पार्श्वभूमी अशी की १५ ऑगस्ट १९४७ ला भारत इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. पण हैद्राबादच्या निझाम संस्थानाने भारतात विलीन होण्यास नकार दिला. कासीम रझवीने उभ्या केलेल्या रझाकार या संघटनेने भारतात विलीन होण्याच्या बाजूने बोलणाऱ्यांवर अत्याचार सुरु केले. रझाकाराच्या या अत्याचाराविरुद्ध लढून लोकशाही भारतात विलीन होण्यासाठी अनेकांनी आपले प्राण गमावले. त्यातले पत्राकारितेच्या क्षेत्रातील “शोएब उल्लाह खान ” यांचे हौतात्म्य स्मृतीत ठेवण्याजोगे आहे. त्यांनी मरेपर्यंत आपली लेखणी रझाकारांच्या विरोधात व भारताच्या बाजूने चालवली. त्यासाठी हौतात्म्य पत्करले.मात्र दुर्दैव असे की या “शोएब उल्लाह खान “यांच्या हौतात्म्याचा कधीही गौरव होत नाही. शोएब उल्लाह खान हे संपूर्णत: विस्मृतीत गेले आहेत. पत्रकार दिनाच्या दिवशीही देशासाठी शहीद झालेल्या व मरेपर्यंत लेखणी न थांबवणाऱ्या या पत्रकाराची आठवण काढली जात नाही.
आपापल्या राजकीय व सांस्कृतिक अजेंड्याला पुरक ठरणारे इतिहासातील व्यक्तिमत्व उचलायचे अन् त्यांच्याभोवती धार्मिक-जातीय अस्मितांचे वलय निर्माण करुन त्यावर आपले राजकीय हितसंबंध सांभाळायचे, असा प्रकार चालू आहे.परंतू, अशाही गदारोळात आम्ही आमच्या परिने शोएब उल्लाह खान व त्यांच्यासारख्या अनेक हुतात्म्यांच्या स्मृती जतन करुन त्यांचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी कटिबद्ध राहू हे निश्चित.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)



