महाराष्ट्र

उद्या कोल्हापूर बंदची हाक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना कोल्हापूर दौऱ्यात काळे झेंडे दाखवणार!!

नौशाद मुलाणी संपादक टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (25 जून) शाश्वत विकास परिषदेच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये येत आहेत. मात्र या दौऱ्यापूर्वी त्यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा निर्णय घ्यावा या मागणीसाठी तसेच सर्किट बेंचच्या मागणीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भातील निर्णय रविवारी हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

मोटरसायकल रॅली काढून बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन करू

या बैठकीत सर्वांनीच कोल्हापूर बंद करून मुख्यमंत्री शिंदे मागण्यांकडे लक्ष वेधण्यात यावे, अशी मागणी केली. कृती समितीचे बाबा इंदुलकर म्हणाले की, राजकीय अनास्थेमुळे सर्किट बेंच मागणी पूर्ण झालेली नाही. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यावेळी कोल्हापूर कडकडीत बंद करण्यासाठी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता बिंदू चौकात एकत्र यावे. तेथून शहरात मोटरसायकल रॅली काढून बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन करू. मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांचे पोस्टर तयार करून त्याला काळे फासू. पोलिसांचे कडे तोडून मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखवा असे त्यांनी सांगितले.

शाश्वत विकासाबाबत चर्चासत्रांचे आयोजन

दरम्यान, 25 जून रोजी सयाजी हॉटेल मधे विक्टोरिया सभागृहात सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वेगवेगळे विषय घेऊन शाश्वत विकासाबाबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी या परिषदेतून मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार आणि घोषणाही होणार आहेत.

त्या परिषदेसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, स्थानिक आमदार, खासदार यांचेसह राज्यस्तरावरून त्या त्या विभागाचे प्रधान सचिव, सचिव, व्यावसायिक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व मनोगत नंतर मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रास्ताविक करतील व नंतर पाच भागात चर्चासत्र होणार आहेत. यात फाउंडरी आणि इंजीनियरिंग, टेक्स्टाइल, आयटी, टुरिझम आणि फ़ूड प्रोसेसिंग असे विषय असणार आहेत. शेवटी विविध उद्योग व्यवसायाशी निगडित सामंजस्य करार होतील व कोल्हापुरच्या अनुषंगाने घोषणा होतील.

“महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (मित्र) संस्था, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कोल्हापुरात शाश्वत विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जिल्ह्यातील आर्थिक विकासाच्या संभाव्य क्षेत्राची क्षमता विचारात घेऊन आर्थिक विकास तसेच इतर विकासात्मक बाबी निवडक प्राधान्यकृत क्षेत्रांमध्ये (वस्तु निर्माण-फाउंड्री अँड इंजीनियरिंग, वस्त्रोद्योग, पर्यटन, माहिती व तंत्रज्ञान, पर्यटन व अन्न प्रक्रिया) कार्यरत असणारे भागधारक, तज्ञ, उद्योजक, अभ्यासक या सर्वांसोबत शासन विकासाबाबत विचारविमर्श होऊन विकासाला शाश्वत रूप देण्याकरिता या शाश्वत विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button